कुटुंबकलहातून संपले अख्खे कुटुंब

पाच जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या
मुंबई | प्रतिनिधी |
कौटुंबिक कलहातून नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आलोक माटूरकर असे आरोपीचे नाव असून, या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत नागपूर तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.

आलोकने पत्नी विजया माटूरकर, मुलगी परी माटूरकर (14 वर्ष), मुलगा साहिल माटूरकर (12 वर्ष), सासू लक्ष्मीबाई बोबडे आणि मेहुणी अमिषा बोबडे यांची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक पाचपावली परिसरात रंभाजी रोड बागल व्यायामशाळेजवळ भाड्याच्या घरात राहात होता. तर, सासू आणि मेहुणी त्यांच्या घरापासून 100 मीटर दूर पटवी गल्ली इथे राहात होती. आलोकने रविवारी रात्री सासू आणि मेहुणीची हत्या केली. त्यानंतर घरी येऊन पत्नी आणि मुलांची हत्या करत गळफास लावून आत्महत्या केली.

अलोक हे टेलरिंगचं काम करायचा. अलोकने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकले नाही. पण, कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

Exit mobile version