अलिबाग बसस्थानकाच्या कामाला मिळणार गती

मुख्यमंत्र्यांचे आ. जयंत पाटील यांना आश्वासन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील 62 वर्षे जूने असलेले एसटी बस स्थानक सोयी सुविधांसह नव्याने उभारण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाने केला. या कामाचा शुभारंभदेखील मोठ्या थाटात 28 ऑगस्ट 2019 रोजी झाला. परंतू लालफितीत अडकलेल्या नव्या बस स्थानकाबाबत शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत आवाज उठविला. यावर उत्तर देताना सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या बस स्थानकाचे काम लवकरच सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

अलिबाग हे जिल्हयाचे ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 1 एप्रिल 1961 रोजी प्रवाशांच्या सोयीसाठी अलिबाग स्थानक उभारण्यात आले. या स्थानकातून नेहमी हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांसह पर्यटक व कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जून्या स्थानकाचे नुतनीकरण करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेतला होता. मे 2019 मध्ये अलिबाग स्थानकातील माती परीक्षण पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनिअरिंग या कंपनीकडून करून नुतन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला होता. नवीन आराखड्याप्रमाणे तळ मजला व पहिला मजला अशा पध्दतीने बस स्थानकामध्ये इमारत आहे. स्थानकातील तळ मजल्यामध्ये 14 फलाट आहेत. प्रवाशांसाठी खास प्रतिक्षालय, उपहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक कार्यालय असणार आहे. तसेच, पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष असणार आहे. सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करण्याची क्षमता नव्या स्थानकात असणार आहे.

7 हजार 630 चैारस फुट इतक्या क्षेत्रावर नवीन स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. बाहेर जाण्याचा व आतमध्ये येण्याचा एसटी बसचा मार्ग वेगळा असून प्रवाशांसाठीही वेगळा मार्ग आहे. या आराखड्यानुसार तयार करण्यात येणाऱ्या स्थानकाच्या कामाचा भूमीपूजन शुभारंभ झाला होता. एसटी महामंडळाच्या विभागानुसार 18 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2021 पर्यंत काम होणे अपेक्षीत होते. मात्र चार वर्षे होऊनही या स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली नाही. अलिबाग स्थानकाच्या कामाची निविदा 19 सप्टेंबर रोजी मागविण्यात आली होती. त्यानंतर या निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्या. मात्र लालफितीत अडकलेल्या या कामामुळे अलिबागकरांची गैरसोय होत आहे.

याबाबत शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत आवाज उठविला. या कामाला गती कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालु राज्य दर सुचीनुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले.

Exit mobile version