खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन
| उरण | वार्ताहर |
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून, या आजाराने मुंबईमध्ये थैमान घातले आहे. या आजाराने रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात प्रवेश केला आहे. मात्र, पनवेल तालुक्याला लागून असलेल्या उरण तालुक्यात गोवर आजाराचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, सर्वांनी योग्य ती खबरदारी व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी केले आहे.
वाढत्या गोवर आजाराच्या प्रादुर्भावाबाबत माहिती देताना इटकरे यांनी सांगितले की, गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. रुग्णाच्या संपर्कात आल्या नंतर 10 ते 12 दिवसांनंतर त्याची लक्षणे दिसतात. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्याची जळजळ इत्यादी गोवर आजाराची लक्षणे आहेत. ज्यांना कोणाला गोवर आजाराची लक्षणे आढळली आहेत, अशा नागरिकांनी आपल्या लहान मुलांना त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करावे. जेणेकरून गोवर आजारावर योग्य वेळेत उपचार होईल व गोवर आजार आटोक्यात येईल, असे आवाहनही डॉ. राजेंद्र इटकरे यांनी केले आहे.