औषधी गुणधर्म व पारंपरिक वाण
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली सुधागड सह जिल्ह्यात ठाकूर व आदिवासी बांधव आपले शेती व डोंगर उतारावर गावठी भाजीपाला लावतात. त्यातील महत्त्वाची भाजी म्हणजे ठाकरी मिरची. हे पारंपरिक वाण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचा तिखटपणा, वैद्यकीय गुणधर्म आणि अनोख्या चवीमुळे या मिरचीला सर्वत्र ग्राहकांकडून मोठी मागणीदेखील आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध आहे.
रायगड जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी हे आदिवासी बांधव लाकूडतोड, मजुरीबरोबरच डोंगर उतारावर लाल मातीमध्ये गावठी पालेभाज्या, काकडी, भोपळा व मिरची यांची शेती करतात. जूनमध्ये पावसाच्या पाण्यावर या ठाकरी मिरचीच्या गावठी वाणाची लागवड आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने करतात. साधारण फूट ते सव्वा फूट वाढणार्या या मिरचीच्या एका झाडाला दोनशे ते अडीचशे व एक ते सव्वा इंच लांबीच्या मिरच्या लागतात.
सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पीक हाती येते. या मिरचीला ठाकरी मिरची, बुटकी मिरची व ठेंगू मिरची म्हणूनही ओळखले जाते. सध्या या मिरचीचे भरघोस पीक आले असून, गाव तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी आदिवासी महिला गावठी भाज्यांसह गावठी/ठाकरी मिरची विक्रीसाठी येत आहेत. वाट्याला दहा रुपये भाव असून, त्यात साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम मिरच्या असतात. काही वेळेला भाव केल्यास 20 रुपयांमध्ये तीन वाटे मिळतात. मेहनतीच्या मानाने हा भाव अतिशय कमी असतो. त्यातच पावसाच्या पाण्यावरच ही पिके घेतली जातात. इतर हंगामात घेतली जात नाहीत. त्यामुळे इतर वेळी ती उपलब्ध होत नसल्याने त्यांना खूप मागणी असते. अनेकजण शहरातील नातेवाईकांना आवर्जून भेट देतात, असे शिक्षक राजू बांगारे यांनी सांगितले.
मिरचीची चव न्यारी
चवीने अतिशय तिखट असलेली ही मिरची अनेक जण तेलात तळून खातात. हळद, मीठ टाकून सुकवून तसेच लोणचे करुनदेखील ही मिरची खाल्ली जाते. तर याचा ठेचा किंवा चटणी करुन चवीने खाल्ली जाते.
वैद्यकीय फायदे
तापामध्ये किंवा आजारपणात ग्रामीण भागात तोंडाला चव येण्यासाठी मीठ व या मिरचीचा ठेचा करून खाल्ला जातो. या ठेच्याला आदिवासी भाषेत रीठा असे म्हणतात. नाचणीच्या भाकरीसोबत या मिरचीचा ठेचा किंवा रिठा मधुमेही व्यक्तींसाठी फायदेशीर असतो.
ठाकरी मिरचीला पेटंट मिळायला हवे. तसेच चांगला हमीभाव मिळून हक्काची बाजारपेठ मिळाली पाहिजे. मिरचीचे हे गावठी वाण जतन करून आदिवासी व ठाकूर बांधवांना याबाबतची शास्त्रीय मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. तसेच इतर हंगामातही या मिरचीचे उत्पादन घेतले पाहिजे, जेणेकरून आदिवासी व ठाकूर समाजाला चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
रमेश पवार
सुधागड, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, दिल्ली संलग्न