। अलिबाग । प्रमोद जाधव ।
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच मालमत्तेच्या सुरक्षेसाठी शाळेच्या परिसरात संरक्षक भिंती उभारल्या जातात. परंतु, रायगड जिल्हा परिषदेच्या 787 शाळा संरक्षक भिंतीविना, 187 शाळांना काटेरी, तारांचे कुंपण आणि 189 शाळांच्या संरक्षक भिंती पक्क्या असून, त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शाळांची सुरक्षा वार्यावर असल्याचे समोेर आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संरक्षक भिंतींची अनेक वर्षांपासून चाळण झालेली असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळा परिसरात मोकाट गुरांचा वावर वाढतो. कुंपण नसलेल्या शाळा तर मद्यपी व जुगार पत्त्यांचा अड्डाच बनल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन हजार 566 शाळा असून, या शाळांमध्ये 92 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. बौद्धिक व शारीरिक विकास साधण्यासाठी शिक्षणाबरोबरच अन्य ज्ञान विद्यार्थ्यांना या उपक्रमांतून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये खाद्य महोत्सव, एक दिवस दप्तराविना असे अनेक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणून त्यामध्ये टिकवून ठेवण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांना दुरुस्ती करणे, नवीन इमारत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. जिल्हा परिषदेने शाळा गृह दुरूस्तीसाठी दोन कोटी 17 हजार, तसेच नवीन शाळा बांधणीसह संरक्षक भिंतीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, आजही जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा संरक्षक भिंतीविना असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील 117, माणगावमधील 80, पनवेलमधील 128, पेणमधील 129, महाडमधील 77, अलिबागमधील 61 अशा 787 शाळा संरक्षक भिंतीपासून वंचित राहिल्या आहेत. याकडे प्रशासनासह शाळा व्यवस्थापन समितीचेही दुर्लक्ष होत आहे. अनेक शाळांना कुंपण नसल्याने शाळार बंद झाल्यावर त्या मद्यपींचा अड्डा बनत आहेत. जिलहा परिषदेच्या काही शाळा गुणवत्तेच्या निकषावर पुढे येत आहेत, तर काही शाळा डिजिटल होत असताना, जिल्ह्यातील शाळांच्या दुरवस्थेची जबाबदारी कोणाची? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, 189 शाळांच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम केले असले, तरीदेखील ते तुटलेल्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील 187 शाळांना तारेचे व काटेरी कुंपण आहे. परंतु, अनेक शाळा अजूनही संरक्षक भिंतीच्या प्रतिक्षेत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनदेखील त्याची ठोस अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे नक्की हा निधी कुठे जातो, असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेतून विचारला जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्याचा परिणाम आपसूकच विद्यार्थी पटसंख्येवरदेखील होत आहे. त्यामुळे वर्षागणिक जि.प. शाळांची पटसंख्या घटत असताना, खासगी शाळांच्या पटसंख्येचा आलेख वाढता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी शिक्षण विभागाने विचार करुन निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांना पक्क्या संक्षक भिंती आहेत. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती नाहीत, त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी,
प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद
तालुकानिहाय संरक्षण भिंती नसलेल्या शाळा पेण 129 पनवेल 128 कर्जत 117 माणगाव 80 महाड 77 अलिबाग 61