। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी करतांना श्री गणेशाच्या मूर्तीच्या उंचीची मर्यादा सार्वजनिक गणेश उत्सवात 4 फूट आणि घरगुती गणेश उत्सवात 2 फूट अशी घालून दिली आहे. कोव्हिड परिस्थिती पाहता जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना जाचक असल्याचे निदर्शनास येत आहे.त्या अटी शिथिल केल्या जाव्यात, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून पालिकेला जात आहे.
राजकीय मेळावे, आंदोलने, सभा कोणतेही निर्बंध न पाळता धूम धडाक्यात होतात, मग गणेशोत्सवासारखे हिंदूचे सण साजरे करताना कोव्हीडचे निर्बंध का लादले जातात, महानगर पालिकेने गणेशोत्सवासाठी काढलेल्या मार्गदर्शक सूचना शिथिल कराव्यात, अशी मागणी शिव संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सानपाडा 79 चे शिवसेना शाखाप्रमुख बाबाजी महादेव इंदोरे यांनी नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देऊन केली आहे.
मार्गदर्शक सूचनामध्ये श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइड व फेसबूक द्वारे करावी. श्री गणपती मंडपामध्ये निर्जंतुकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. श्रींचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढू नये. इत्यादि मार्गदर्शक सूचना 2022 मध्ये 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार्या गणेश उत्सवासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र आता मूर्तीकारांनी मोठ्या मूर्तीं घडवल्या आहेत. जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना उशिराने प्रसिद्ध झाल्यामुळे सर्व गणेश उत्सव मंडळांनी श्री गणेशांच्या मूर्ती अगोदरच बूक केल्या आहेत. दोन वर्षानी गणेश उत्सव मोकळ्या वातावरणात निर्बंधाशिवाय साजरा करता येईल. यामुळे सर्व नागरिक गणेश उत्सव मंडळ आनदांत होते. मात्र गणेशोत्सवासाठी काढलेल्या मार्गदर्शक सूचनामुळे गणेशोत्सव मंडळे नाराज आहेत, त्यामुळे लोक भावनेचा विचार करून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना ताबडतोब शिथिल कराव्यात. जेणेकरून दोन वर्षाने साजरा होणारा गणेश उत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा करता येईल. अशी मागणी इंदोरे यांनी नवी मुंबई महानगर पालिकेकडे केली आहे.