यावर्षीही दहीहंडी साधेपणानेच – मुख्यमंत्री

मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीही सरकारने सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे.जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍न महत्वाचा असून,सरकार त्यालाच सर्वात प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. दहिहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. तर गर्दी टाळण्यासाठी सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यानंतर सर्व बाबींवर सखोल चर्चा केल्यानंतर यंदाही दहिदंडीला परवानगी देण्यात आलेली नाही.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्‍नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांनं करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना.
बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. इस्त्रायलनं तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केली आहे. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोटं आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपण जर समजुतीनं वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूया. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही. नीती आयोगानं जे सांगितलंय, ते लक्षात घेतलं पाहीजे. गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवली आहे, ती इतर कोणत्याही राज्यानं वाढवलेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अर्थचक्र सावरु द्या
आपण दुसर्‍या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल. असंही मुख्यमंत्री म्हणाले.

गोविंदा पथकांच्या मागण्या

  1. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.
  2. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.
  3. गोविंदा पथक हे दुसरीकडे कुठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत.
  4. सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.
  5. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

मनसेची घोषणा
यंदा 31 ऑगस्ट रोजी विश्‍वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केलं आहे. बुधवारी दुपारी त्यांनी ही पोस्ट केली असून त्यामध्ये विश्‍वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार, असं म्हटलं आहे. मनसेप्रमाणेच घाटकोपर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राम कदम यांनीही यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय.

Exit mobile version