शेकाप कार्यकर्ते मधुकर अर्बन यांचा दावा
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील चार दिवसांपूर्वी राजिवली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचा दावा या गावचे रहिवासी व शेकाप कार्यकर्ते तथा सुरव तर्फे तळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मधुकर अर्बन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जसजशा जवळ येत आहेत तसतसे माणगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध राजकीय पक्षांतर्फे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेतले जात आहेत.रायगडात महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक ठिकाणी पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत असल्याने राज्यातील महाविकास आघाडीची या पक्षप्रवेशांमध्ये जोरदार चर्चा रायगडात सर्वत्र सुरु आहे.आघाडीतील मित्रपक्ष असलेला शेकापही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकला चालोचा नारा देत असल्याने येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे. राजिवलीमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश या मथळ्याखाली काही वृत्तपत्रात मंगळवार दि.9 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते.या वृत्ताचा खरपूस समाचार घेण्यासाठी राजिवली गावातील शेकापचे तडफदार कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर अर्बन यांनी मंगळवार दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी माणगाव येथे तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेला तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे,पक्षाचे तडफदार कार्यकर्ते बळीराम खडतर,बळीराम मोरे,सुरेश अर्बन,विलास मोरे,योगेश मोरे,नथुराम मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राजिवली गावचे मधुकर अर्बन यांनी सांगितले कि,राजिवली गावातील शेकापचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत हे वृत्त खोडसाळपणाचे आहे,शेकापचा कोणी कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षात गेला नसून शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.राजिवली गावात शेकाप भक्कम आहे.या गावात शेकापमार्फत तसेच आमचे नेते आ.जयंतभाई पाटील, माजी आ.पंडितशेठ पाटील, आस्वाद पाटील,जेष्ठ नेते अस्लमभाई राऊत,राजिप सदस्या आरती मोरे,तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्या माध्यमातूनच विकासकामे झाली आहेत.राजिवली गावात आ.जयंतभाई पाटील यांच्या आमदार निधीतून 5 लाखाचा सामाजिक सभागृह,10 लाखाची पाण्यासाठी विहीर योजना,गावातील 10 लाख रुपये खर्चाचा मुख्य रस्ता,2 लाखाचा अंतर्गत रस्ता,अंगणवाडी दुरुस्ती,स्मशानशेड,5 लाख रुपये खर्चाचे विद्युत पोल,व्यायाम शाळा साहित्य,महिलांसाठी पापड मशीन आदी विकासकामे मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात झाली आहेत.विरोधकांना या विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र पाहिजे असल्यास तेदेखील आम्ही दाखवू. यासाठी विरोधकांनी एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन अर्बन यांनी केले असून या गावात गेली अनेकवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकही विकासकाम केला नसल्याचा दावा मधुकर अर्बन यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.