तिसर्‍या मुंबईला हजारो शेतकर्‍यांचा आक्षेप

एमएमआरडीए कार्यालयात नोंदविल्या विरोधात हरकती

| उरण । वार्ताहर ।

अटल सेतू मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकभोवती ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला 124 गावांतील ग्रामस्थांनी विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.27) सीबीडी, बेलापुर येथिल एमएमआरडीएच्या कार्यालयात सामुहिकरित्या हरकती नोंदविल्या. भांडवलदारांच्या फायद्यासाठी सरकार समाजाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनीआपले आक्षेप नोंदविले आहेत. यावेळी ग्रामस्थांनी शासनाकडे अनेक मागण्या मांडल्या आहेत. हरकती नोंदवण्यासाठी गावोगावी जनजागृती बैठका घेण्यात येऊन ग्रामपंचायतींनी योजनेच्या विरोधात ठराव करून ते शासनाला दिले आहेत.

राज्य सरकारने (दि.4) मार्च रोजी एमटीएचएलच्या आजूबाजूची 124 गावे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील न्यू टाउन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीकडे सोपवण्याची अधिसूचना जारी केली. उरण, पनवेल, पेण परिसरात ही गावे आहेत. तिसर्‍या मुंबईने नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात 80 गावे, खोपटा न्यू टाउन अधिसूचित क्षेत्रातील 33, मुंबई महानगर प्रदेश आराखड्यातील दोन आणि रायगड प्रादेशिक योजनेतून नऊ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने आपल्या अधिसूचनेनंतर 30 दिवसांच्या आत सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी स्थानिक शेतकरी, गावातील नेते, राजकारणी आणि कार्यकर्त्यांनी एमएमआरडीए विरोधी शेतकरी समितीची स्थापना करून या प्रकल्पाविरोधात लढाई उभारण्याची तयारी केली आहे.

एमएमआरडीए भूसंपादन विरोधी शेतकरी समिती उरणच्या वतीने आज कोकण भुवन आयुक्तालय सीबीडी बेलापूर येथे एमएमआरडीए विरोधात माजी आमदार तथा रायगड शिवसेना प्रमुख मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्याकडे हरकती सादर केल्या. यावेळी तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, सुधाकर पाटील, बी.एन.डाकी, कैलास म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील, माजी जि.प. सदस्य जीवन गावंड, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य विनोद म्हात्रे, खोपटे सरपंच विशाखा ठाकूर, गोवठणे सरपंच प्रणिती म्हात्रे, वशेणी सरपंच अनामिका म्हात्रे, सरपंच कलावती पाटील यांच्यासह एमएमआरडीए भूसंपादन विरोधी शेतकरी समितीचे सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version