| महाड | उदय सावंत |
विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर करमणूक म्हणून मुलांचा ओघ बगीचांकडे वळतो. सध्या महाड शहरात देखील शहरातील मुलांनी बगीचांमधील खेळांचा आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महाड शहरातील तिन्ही बगीच्यांकडे बालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील खेळांचे साहित्य आणि परिसराची दुरवस्था झाली आहे.
एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर मुलांची पावले बगीचे, विविध उपक्रम आणि मैदानी खेळांकडे वळतात. त्यामुळे गेले काही दिवस शहरातील बगीच्यांकडे मुलांसह त्यांच्या पालकांनी गर्दी केलेली आहे. महाड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, चवदार तळे आणि दादली तुला जवळ अशा तीन बागा आहेत. त्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बगीचा काही प्रमाणात सुस्थितीत आहे. मात्र, दादली पुलाजवळ असलेली बाग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्णतः उजाड झाली आहे. गेली कित्येक वर्ष या बगीच्यावर फुकटचा खर्च टाकला जात आहे. या ठिकाणी वीज व्यवस्था, पाणी आणि खेळांच्या साहित्यांची वाताहत झालेली आहे. त्यामुळे या बगीच्याचा आधार गर्दुल्ले आणि मद्यपींनी घेतलेला आहे. पोलीस प्रशासनदेखील याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी असलेल्या भव्य वृक्षांवर वटवाघळांचा वावर आहे. या वटवाघळांची विष्ठा खाली ये-जा करणार्या लोकांवर पडत असल्याने या बागेकडे मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पाठ फिरवली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. बंद असलेल्या या बगीच्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात प्रशासनाला काहीच वाटत नाही.
महाड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राजमाता जिजाऊ गार्डन बर्यापैकी अवस्थेत आहे. या ठिकाणीदेखील पालिका प्रशासनाने नुकताच लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, या ठिकाणी केवळ लहान मुलांनाच खेळता येईल अशीच खेळणी आणि आसन व्यवस्था आहे. शहरातील इतर दोन बगीचांपेक्षा राजमाता जिजाऊ गार्डन मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेची ज्योत ज्या ठिकाणी प्रज्वलित केली, त्या ऐतिहासिक चवदार तळ्यावरदेखील बगीचा आहे. मात्र, या ठिकाणीदेखील पुरेशी जागा उपलब्ध नाही. शिवाय, या ठिकाणी कोणतीच खेळण्याची साधनेदेखील नाहीत. त्यामुळे सुट्ट्या पडल्या तरी लहान मुलांना खेळण्यासाठी आणि बगीचा आनंद घेण्यासाठी महाड शहरामध्ये अद्ययावत किंवा खेळण्यांच्या साहित्याने पुरेपूर अशा बगीच्या उपलब्ध नाहीत. असलेल्या बगीच्यांकडे पालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे तेथील परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे.