। मुंबई । प्रतिनिधी ।
कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत व्यापक व्यवस्था केली आहे.
मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे अंतर्गत एकूण 139 रेल्वे स्थानके आहेत, जिथून दररोज सुमारे 3,200 लोकल गाड्या धावतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे आयुक्तालयाने सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख सुरू केली आहे. रेल्वे पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत आणि स्थानकांवर सुरक्षेसाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे कडक देखरेख ठेवली जात आहे. विशेषतः पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण यासारख्या प्रमुख स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. दररोज प्रवास करणार्या प्रवाशांना आणि पर्यटकांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबई रेल्वे स्थानकांवर कडक सुरक्षा
