आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय
। मुंबई । प्रतिनिधी ।
निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सोमवारी (दि.14) महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणार्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता ठेवण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे. बैठकीच्या आधी कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिकार्यांना अजेंडा दिला गेला नाही. त्यामुळे आयत्यावेळी अनेक निर्णय होणार आहे.
कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?
आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
मुलुंड-एलबीएस टोलनाका
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका
गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा, नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे






