| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुका पर्यटन क्षेत्र असून येथील समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआप मुरुड समुद्रकिनारी वळतात. परंतु, ऐन हंगामात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस पावसाने सुरूवात केल्याने पर्यटकांची रेलचेल कमी होत गेली. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला पावसाची उघड झाप होत असून, अखेर पाच महिन्यांनी पर्यटक मुरूडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटनावर अवंलंबून असणाऱ्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. यावेळी विविध जिल्ह्यांतील पर्यटक शनिवारी (दि.4) सायंकाळपासून आपल्या वाहनांतून मुरुड समुद्रकिनारी दाखल झाले आहेत. त्यांनी येथील स्वच्छ निळ्याशार समुद्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला, तर काहींनी बनाना राईट्स, घोडागाडी व बाईकवर सवारी केली. त्याचवेळी किनाऱ्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंदही पर्यटकांनी लुटला. त्यामुळे स्थानिक हॉटेल, टपरीधारक व लॉजींग व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






