। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
रायगडाचे पर्यटन पावसाळी विविध ठिकाणच्या धबधब्यामुळे बहरते. हॉटेल व्यासायिकांची आर्थिक कोंडीपासून सुटका पावसाळी पर्यटनामुळे होते. परंतु शासनाच्या पावसाळी पर्यटनबंदीमुळे पुन्हा एकदा पर्यटन कमी झाले. जिल्हा प्रशासनाच्या पर्यटनबंदीच्या आदेशामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बंदी करण्याऐवजी पर्यटनस्थळे बदनाम होऊ नये म्हणून शासनाने नियोजन करण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटक, स्थानिक व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.
मुरुडला पावसाळी पर्यटनासाठी विशाल समुद्र, गारंबी धरण, सावंतखडा धबधबा, चिचघर धबधबा, खरआंबोळी डॅम ही ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांनी फुल्ल असतात. तेथील छोटे व्यावसायिक एक महिन्यात वर्षाचे भागेल एवढे पैसे कमवतात; परंतु मद्य पिऊन अपघात होऊ नये म्हणून पर्यटकांना बंदी घालतात. तरीदेखील पर्यटक नको त्या मार्गाने धबधब्यावर पोहोचतात. त्यात त्यांचे अपघात होतात आणि बंदी जाहीर होते. ते न करता पोलिसांच्या साह्याने योग्य ती तपासणी करून नियोजन करण्याची गरज आहे.
आम्ही बँकांची कर्ज घेऊन हॉटेल सुरू केलीत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे बंद असल्याने खूप नुकसान झाले आहे. तरी गेली सहा महिने पर्यटन सुरु झाल्याने स्थिती सुधारत आहे. आम्हाला पावसाळी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. आमचा समुद्र तर सुरक्षित आहे व गारंबी व सावंतखडा धबधबेदेखील सुरक्षित आहेत. फक्त शासनाने जाण्याचे रस्ते सुधारण्याची गरज आहे. बंदी टाकताना सुरक्षित किनारे व परिसर टाळण्यात यावा. मुरुड हे सुरक्षित आहे, या परिसरात बंदी नसावी.
– मनोहर बैले, हॉटेल मालक