| हमरापूर | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ बायपास व अलिबाग रस्त्यावर तसेच वडखळ नाका ते धरमतर पर्यंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
उन्हाळी पडलेल्या सुट्ट्या तसेच लग्नसराई यामुळे राज्यभरातील चाकरमानी गावाकडे येत आहे. तसेच पर्यटकदेखील रायगड व कोकणात दाखल होऊ लागले असून, येणार्यांची संख्या वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या तिपटीने वाढली. सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासोबत पळस्पे ते इंदापूर काँक्रिटीकरणाचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, वाढलेल्या वाहनांमुळे सकाळपासूनच महामार्गावर मळेघर ते वडखळ बायपास रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालकांचा फटका सर्वांनाच बसत असून, प्रवासी, कामगार तसेच चाकरमान्यांचे फार हाल होत आहेत.