उरण-पनवेल मार्गावर वाहतुक कोंडी

प्रवाशांकडून संताप व्यक्त

| उरण | वार्ताहर |

उरण-पनवेल राज्य महामार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहती समोर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हे ठिकाण कोंडीत वाढ झाली आहे. रोज सकाळी व सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील नवी मुंबईतील विद्यालयात ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना व कामानिमित्ताने बस आणि खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. या नित्याच्या प्रकारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

उरण-पनवेल रस्ता हा उरण तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्वपूर्ण रस्ता बनला आहे. सध्या नवघर उड्डाणपूल ते जेएनपीटी कामगार वसाहत मार्ग हा प्रचंड व सातत्याच्या वाहतुकीचीचा व वर्दळीचा बनला आहे. त्यातच या मार्गावर एखादे वाहन बंद पडले तर या कोंडीत अधिकची भर पडत आहे. कामगार वसाहतीच स्थानक हे उरण मधील प्रवासाचं मुख्य ठिकाण बनलं आहे. याच ठिकाणावरून उरणमधील निम्यापेक्षा अधिक प्रवासी नवी मुंबई, ठाणे,पनवेल व मुंबईत जाण्यासाठी येत आहेत. त्यामुळे या स्थानकांत खासगी इको वाहने, रिक्षा ही उभ्या केल्या जात आहेत. या उरण मधील प्रवाशांसाठी महत्वाच्या असलेल्या ठिकाणी सकाळी 8 ते 10 या तसेच सायंकाळी 7 ते 9 वेळेत वाहन कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूने दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागत आहे.

मार्गाचे रुंदीकरण कधी
उरण-पनवेल राज्य महामार्गावरील वाढत्या वाहनांसाठी नवघर फाटा ते कोटनाका उरण या मार्गाच्या रुंदीकरणाची मागणी होत आहे. त्याचा प्रस्ताव तयार आहे. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होत नसल्याने ही कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचा चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे.
Exit mobile version