वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

पाली अंबा नदीवरील जुना पूल पाण्याखाली

| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी तालुक्यातील अंबा नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. बुधवारी (दि.19) पहाटेपासूनच पाली येथील अंबा नदीच्या जुन्या पुलावरून व दोन्ही बाजूच्या रस्त्यावरून पाणी गेले. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे विद्यार्थी, चाकरमानी व प्रवाशांचा खोळंबा झाला. जिल्ह्यातील सावित्री, अंबा व पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली. पर्यायी भेरव मार्गावरील पुलावर देखील पाणी गेल्याने विद्यार्थी व कामगार वर्ग अडकून पडले. एकूणच नागरिकांचे मोठे हाल झाले.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर केली. मात्र अनेक ठिकाणी सकाळ सत्राचे शाळा व महाविद्यालय सुरू झाल्याने येथील विद्यार्थी व शिक्षकांना सुट्टीचा फायदा झाला नाही. शिवाय त्यांना मुसळधार पावसात शाळा व महाविद्यालय गाठावे लागले. पहाटे पासूनच पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने थांबली होती. आजूबाजूच्या अनेक गावांचा संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत झाले. पुरसदृश्य परिस्थितीने अनेक गावे व वाड्यांचा संपर्क तुटला.

नवीन पूल कुचकामी
अतिवृष्टी मध्ये सुधागड तालुक्यातील पाली अंबा नदीवरील पुलावरून दरवर्षी पाणी जाते. परंतु आता येथे नवीन पूल बांधून दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुलांची उंची व रुंदी वाढवल्याने यंदा पावसाळ्यात वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल अशी आशा होती. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते सखल भागात असल्याने तेथून व जुन्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे प्रवासी व नागरिकांनी संताप व्यक्त केला.

वेळ व पैशांचे नुकसान
वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला हा राज्य मार्ग जोडतो. मात्र येथील वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहू गाड्या, प्रवासी व दळणवळण आदिवर परिणाम होऊन वेळ व पैशांचे नुकसान झाले.

अनेकांच्या स्टेट्सवर पुराचे फोटो व व्हिडीओ
जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले, शिवाय सखल भागात पाणी साठले. काही ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. या संदर्भातील व्हिडीओ व फोटो तसेच प्रशासनाकडून आलेली माहिती अनेकांनी आपल्या स्टेट्सवर ठेवले होते.

पाली अंबा नदीवर नवीन पूल झाल्यावर पावसाळ्यात येथून वाहतूक सुरळीत राहील अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही बाजूला पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प झाली. या नव्या पुलाचा एकमात्र फायदा आहे तो म्हणजे येथे उभे राहून पुलाच्या पाण्याचे फोटो व व्हिडीओ काढू शकतो. असे उपरोधिक म्हणावे लागत आहे. पूल बांधल्यानंतर प्रशासनाने दोन्ही बाजूच्या रस्ता उंच करणे आवश्यक होते.

उमेश तांबट, तरुण, पाली
Exit mobile version