खारजमीन संशोधन केंद्रात शेतकर्‍यांना प्रशिक्षण

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल येथील खारजमीन संशोधन केंद्रात सेंद्रिय शेती पद्धतीने खारजमीन सुधारणा व पीक व्यवस्थापनाबाबत एकदिवसीय प्रशिक्षण झाले. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र योजनेअंतर्गत बुधवार (दि..15) खारजमीन सुधारणा व पीक व्यवस्थापनाबाबत एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या वेळी खारजमीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. के. वैद्य उपस्थित होते. खार व पडीक जमिनींचे वाढते प्रमाण व वाढते शहरीकरण या गोष्टींचा विचार करता आपण एकात्मिक शेती पद्धतीबरोबर सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास जमिनीची जलधारण क्षमता, सुपीकता व जमिनींचे आरोग्य चांगले राहील आणि उत्पन्न निश्‍चित वाढेल, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सेंद्रिय शेती या विषयावरील पुस्तिकेचे व विमोचन करण्यात आले. सहायक कृषी विद्यावेत्ता डॉ. दीपक बोरसे यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचे नमूद केले. सेंद्रिय शेती करताना येणार्‍या अडचणी, शेतीचे महत्त्व, खत, पाणी, जमीन पीक व्यवस्थापनास असलेले महत्त्व, या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सेंद्रिय शेती प्रशिक्षणाची माहिती उपस्थित शेतकर्‍यांना दिली.

आपल्या जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यानुसार सेंद्रियसोबत खतांची जोड दिली पाहिजे. सोबत जमिनीचे पृथ:करण केल्यास पिकांच्या गरजेनुसार खत व्यवस्थापन करून भरघोस उत्पादन मिळेल.

डॉ. मनोज वाहने, संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ
Exit mobile version