चिरनेर | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत कळंबुसरे, ता. उरण, जि. रायगड येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग पार पडला. राज्य शासनाने नुकताच ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू केलेला आहे. याप्रमाणे शेतकरी ई-पीक मोबाईल अॅपमधून स्वतः शेतात लावलेली पिके व फळबाग, सिंचन पद्धती, शेतातील झाडे इत्यादी माहिती भरणार आहेत. यावरुन गाव नमुना 12 मध्ये पिके अद्ययावत केली जातील. या प्रकल्पामुळे शेतकरी आपल्या पिकाबाबत आत्मनिर्भर होतील, अशी अपेक्षा आहे. ग्रामस्तरावर प्रचार व प्रसिद्धीचे काम राज्यभर सुरू असून, उरण तालुक्यातील कळंबुसरे या गावात शेतकरी बांधवांचे प्रशिक्षण पार पडले.
प्रशिक्षणासाठी गावाचे सरपंच नूतन नाईक, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, ग्रामसेविका स्वाती पाटील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आदींहस ग्रामस्थ व शेतकरी मंडळी उपस्थित होते. जुई सजेचे तलाठी शशिकांत सानप यांनी उपस्थितांना ई-पीक पाहणीमुळे शेतकर्यांना थेट शासकीय मदत, शेतमालाची आधारभूत किंमत, विकेल ते पिकेल योजना, नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई, पिकाची अवस्था, पेरणी व पिकाखालील सिंचन क्षेत्र याबाबत प्रशिक्षणामध्ये माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.