राष्ट्रवादी शरद पवार गटाची आयुक्तांकडे मागणी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल पुरवठा अधिकाऱ्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव आदित्य जानोरकर यांनी कोकण आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पनवेल येथील पुरवठा अधिकारी या बऱ्याचदा कार्यालयात वेळेवर हजर नसतात तसेच त्या तहसीलदार यांना न सांगता कुठे निघून जातात याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे जानोरकर यांनी म्हटले आहे. अनेक रेशन दुकानात भ्रष्टाचार सुरू असताना रेशन दुकानांची तपासणी केली जात नाही. तसेच पुरवठा अधिकारी या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसोबत व्यवस्थित बोलत नाहीत आणि त्यांना बसायला जागा देत नाहीत. येथील पुरवठा कार्यालयात खासगी माणसे काम करतात. त्यांना पगार कोण करतो? तसेच एजंटदेखील अनेकदा ये-जा करतात. शिवभोजन थाळी केंद्राचे मानधन पाठवण्यासदेखील जाणूनबुजून उशीर केला जात असल्याचे जानोरकर यांचे म्हणणे आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांनादेखील धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
पनवेल तालुक्यात 199 रेशनिंगची दुकाने आहेत. यातील अनेक दुकानात भावफलक आणि साठा फलक लावलेला नसतो. तसेच प्राधान्य आणि अंत्योदय लाभार्थ्यांची यादी दुकानात ठेवलेली नसते. धान्याचे नमुने, साठा रजिस्टर, विक्री बुक नसतो. रेशन बुक आणि तक्रार बुक देखील नसते. दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ दर्शवणारा फलक नसतो. तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि हेल्पलाइन क्रमांक नमूद केलेले फलक नसतात. असे असतानादेखील पुरवठा अधिकारी दुकानांची तपासणी करत नाहीत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. त्यामुळे त्यांची पनवेल येथून तात्काळ बदली करावी अशी मागणी कोकण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
यापूर्वीचे तहसीलदार विजय पाटील यांनी देखील पुरवठा अधिकारी यांना अनेक नोटिसा बजावल्या होत्या, तसेच सध्याच्या तहसीलदार यांनीदेखील त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
