|अलिबाग | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोप उपक्रमांतर्गत देशभरात दि. 9 ते 20 ऑगस्टदरम्यान ‘माझी माती, माझा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एलएसपीएम महाविद्यालयाकडून सातिर्जे या दत्तक गावात 75 वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह रवींद्र ठाकूर, सातीर्जे सरपंच प्राजक्ता खडपे, ग्रामसेविका पूजा पाटील, प्राथमिक शिक्षिका रिना माळवी यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, सातीर्जे गाव परिसर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रवीण ठाकूर, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. लीना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रा.से.यो. विभागाकडून कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन गोंधळी, प्रा. प्रवेश पाटील, प्रा. तृप्ती खोत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन रा.से.यो स्वयंसेवक यशराज वालावलकर, स्नेहा झिराडकर, अंजली शर्मा, दिशा दळवी यांनी केले.