या देशाच्या हृदयांतरीचे सूर; या देशाचा, या देशाच्या प्राचीन परंपरेचा, इथल्या जीवनशैलीचा आत्मा, हिंदी सिनेमाने व्यवस्थित जपला, जोपासला आणि प्रेक्षकांपुढे मांडला. जनमानसाच्या भावनांचा प्रतिध्वनीच या सगळ्या गाण्यांमधून ऐकू येतो आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अगदी खेड्यापाड्यातल्या जनतेचा सहभाग होता. गांधींच्या कल्पक नेतृत्वाने सत्याग्रह, हरताळ, खादी अशा विविध मार्गांनी देशातल्या गरीब-श्रीमंत अशा सर्व नागरिकांना स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी लढत असल्याची अनुभूती दिली. परिणाम असा झाला, की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ते ‘आपण’ मिळवलं आहे, दुसर्या कुणीतरी आपल्याला मिळवून दिलेलं नाही, असा विश्वास जनतेला वाटला. त्यामुळे प्रत्येकाला अगदी वैयक्तिक पातळीवर स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद झाला.
चित्रपट ही आधुनिक काळातली लोककला, लोकांशी, जनसमुदायाशी संवाद साधणारी. जनतेच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब प्रकट करणारी. त्या चित्रपटांमध्ये देशाचं स्वातंत्र्य, स्वराज्य, आपलं राज्य या भावना उत्कटतेने व्यक्त झाल्याशिवाय कशा राहतील? हिंदी चित्रपटांमधल्या देशभक्तीपर गीतांमधून या भावना उत्तम व्यक्त झालेल्या दिसतात.
‘जागृति’ या चित्रपटातलं ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’ हे गांधीजींची स्तुती करणारं गाणं आपण सोडून देऊ. पण त्या चित्रपटातलं ‘आओ बच्चों तुम्हे दिखायें झाकी हिंदुस्तानकी’ या गाण्याची दखल घ्यावीच लागेल.
या गाण्यात पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, बंगाल अशा विविध प्रांतांचा गौरव आहे तिथल्या लढाऊ वृत्तीचं कौतुक आहे. अशा या देशाची माती कपाळी लावा, असा संदेश आहे.
आणि हे सारं बालकांना सांगितलेलं आहे! स्वातंत्र्यात मोठं होत असलेल्या बालकांना सार्या देशाचा मोठेपणा सांगितला आहे. जणू कुणी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला वयस्क भारतीय नागरिक मुलांना देशप्रेमाची दीक्षा देतो आहे!
‘जागृति’ हा चित्रपट तरुण होऊ घातलेल्या मुलांचा चित्रपट होता. त्यात या वयाच्या मुलांना उद्देशून आणखी एक गाणं आहे.
हम लाए हैं तूफानसे कश्ती निकाल के
इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के
आम्ही मोठ्या परिश्रमाने वादळ पार केलं आहे, आता पुढच्या प्रवासाची जबाबदारी तुमची आहे. उतू नका, मातू नका, या देशाची काळजी घ्या!
या गाण्यामागोमाग मग आठवतं ते ‘गंगा जमना’ या चित्रपटातलं हे गाणं:
इन्साफ की डगर पे, बच्चो दिखाओ चल के,
ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के ।
पुन्हा लहान मुलांना केलेला उपदेश! समता, न्याय, आत्मसन्मान आणि सार्या जगाविषयी प्रेम! एका पिढीने पुढच्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याची मनीषा यात व्यक्त होते आहे. राज्य करण्याची आकांक्षा कुठेच नाही. मग ‘सन ऑफ इंडिया’ या चित्रपटात एक गाणं लहान मुलाच्या तोंडीच येतं:
नन्हा मुन्ना राही हूँ, देशका सिपाही हूँ.
लहान मुलांना उद्देशून असलेल्या या गाण्यांमध्ये ‘लम्बे हाथ’ या चित्रपटातलं पुढचं गाणं विशेष आहे:
प्यारकी राह दिखा दुनियाको, रोके जो नफरतकी आँधी
तुममेही कोई गौतम होगा, तुममेही कोई होगा गाँधी
या गाण्याची चाल मार्चिंग साँगची आहे. सैनिकांनी कवायत करताना ऐकू यावं असं हे गाणं शब्दांमध्ये काय म्हणतं? ‘तुमच्यातूनच कोणी गौतम निपजेल, तुमच्यापैकीच कोणी गांधी होईल!’ सैनिकांच्या तोंडून शांतीचा संदेश देणारं गाणं जगात दुसरं असेल काय!
पण वैर धरायचं ते कुप्रवृत्तींशी, भांडण करायचं ते दुष्टपणाशी; ती कुप्रवृत्ती, तो दुष्टपणा ज्या माणसात, ज्या वर्गात आढळतो; त्या माणसाला, त्या वर्गाला नाही शत्रू म्हणायचं. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करायचा. कसा? प्रेमातून. सत्याच्या आग्रहातून.
या खंडप्राय देशातल्या गरीब, नाडलेल्या जनतेच्या हाती शस्त्र न देता त्यांना लढवय्ये बनवण्याची किमया केली गांधींनी. त्यामुळे त्यांना सुभाषबाबू राष्ट्रपिता म्हणाले. रवींद्रनाथ महात्मा म्हणाले.
मात्र हिंदी सिनेमातली सगळीच देशभक्तीपर गाणी लहान मुलांचीच होती, असं मुळीच नाही. रगेल भावनासुद्धा व्यक्त झाली आहे.
ये देश है वीर जवानोंका, अलबेलोंका मस्तानोंका, इस देशका यारों क्या कहना, ये देश है दुनियाका गहना!
रक्त सळसळलंच पाहिजे, असं हे गाणं आहे. देशाची कौतुकं गायल्यावर शेवटच्या कडव्यात शब्द येतात:
दिलवरके लिये दिलदार हैं हम, दुष्मनके लिये तलवार हैं हम
मैदांमे अगर हम डट जार्ये, मुश्किल है के पीछे हट जाये!
काय गाणं लिहिलंय साहिरने आणि काय मर्दानी चाल लावलीय ओ पी नय्यरने!
असं असलं तरी या देशाचं हृदय प्रकट करणारं गाणं कुठलं, असा प्रश्न निघाला, तर मात्र ‘जिस देशमे गंगा बहती है’ मधलं शैलेंद्रचं हेच गाणं समोर येतं.
होठों पे सच्चाई रहती है
जहाँ दिल में सफाई रहती है
हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं
जिस देश में गंगा बहती है
हे गाणं एकामागून एक मजले चढत जातं. प्रथम ते पाहुण्यांना आम्ही किती मान देतो, हे सांगतं. जे मिळतं ते सर्वांनी वाटून घ्यावं, हे मूल्य सांगतं. मग ते ‘इतरां’चा दाखला देतं. त्यांना जास्त कळत असेल, पण आम्हाला एकेका जिवाची किंमत कळते, असं बजावतं. आणि शेवटी ‘जिथून मिळेल तिथून आम्ही शिकत गेलो, आपला-परका आम्ही मानत नाही, स्वार्थासाठी स्वत्व आम्ही विकत नाही आणि आता आमचं बघून सार्या जगालाच आमच्यात विलीन व्हावंसं वाटू लागलं आहे,’ असा शेवट करतं.
हे शब्द या देशाच्या अंत:करणातून आल्यासारखे आहेत. देश गरीब असेल, शस्त्रसंपन्न नसेल; पण सार्या जगाला अभिमानाने सांगण्यासारखं, सार्या जगाने आम्हाला गुरु मानून आमच्याकडून शिकावं असं आमच्याकडे भरपूर काही आहे. ते आहे आमचं शील. भेदभावाला तिलांजली देऊन सर्वांना आपलं मानून, सुखदु:खांना आपसात वाटून घेऊन आम्ही समाधानी आहोत. सार्या जगासाठी एक आदर्श उभा करत आहोत!
भगतसिंग हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातलं एक लखलखीत नाव. भगतसिंगावर तीन तरी हिंदी चित्रपट येऊन गेले आहेत. भगतसिंगाला अत्यंत आवडून गेलेलं ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे गाणं त्यागाचं, बलिदानाचं गाणं आहे.
हिंदी चित्रपटाची संस्कृती अशी उदार, समावेशक असल्याने त्यात कुण्या परदेशी आत्म्याचं तडफडणंसुद्धा येतं. मातृभूमीपासून दुरावल्यावर काय होतं, हे ‘काबुलीवाला’ या चित्रपटातल्या प्रेम धवनने लिहिलेल्या आणि सलील चौधरीच्या संगीत दिग्दर्शनाखाली मन्ना डेने गायलेल्या या गाण्यातही हृदयद्रावकपणे आलं आहे.
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछडेे चमन; तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू, तू ही मेरी आबरू; तू ही मेरी जान
राष्ट्रप्रेम म्हणजे एकोपा, देश म्हणजे देशाची प्रगती, या भावनाप्रवाहाला 1962 साली मोठा धक्का बसला. चीनने लडाख आणि अरुणाचल, या दोन ठिकाणी आक्रमण केलं आणि देशाच्या हृदयाला जखम झाली. युद्ध तर झालं पण त्यात विजय मिळाला नाही. मात्र, अतिशय कठीण परिस्थितीत जवानांनी केलेल्या प्रतिकाराच्या, शौर्याच्या कहाण्या देशभर पोहोचल्या. हिंदी चित्रपटात त्यांना शब्दबद्ध केलं कैफी आझमीने आणि त्या शब्दांना आवाज दिला महम्मद रफीने:
कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो
‘हकीकत’मधल्या या गाण्यात शौर्य आहे, मृत्यू आहे, राम-लक्ष्मण आहेत, बलिदान आहे आणि देशाविषयी प्रखर निष्ठा आहे. मदन मोहनच्या चालीत हे सारं व्यक्त झालं आहे.
यापूर्वी देशभक्तीपर गाणी होती; आता त्यात सैनिक आले, सैनिकांची गाणी आली, जसं ‘प्रेमपुजारी’मधलं
ताकत वतन की हमसे है, हिम्मत वतन की हमसे है
इज्जत वतन की हमसे है, इन्सान के हम रखवाले
मात्र अशा गाण्यांमध्येदेखील अखेरीस पुरस्कार शांततेचाच होता. आणि ‘बॉर्डर’सारख्या चित्रपटात तर भारत पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमधलं शत्रुत्व किती दुर्दैवी आहे, असंसुद्धा जावेद अख्तरच्या या गाण्यात व्यक्त झालं आहे.
मेरे दुष्मन, मेरे भाई, मेरे हमसाये
तू माझा वैरी, तूच माझा बंधू; तुला-मला एकमेकांपासून वेगळं करणंच कठीण! या देशाच्या हृदयांतरीचे सूर; या देशाचा, या देशाच्या प्राचीन परंपरेचा, इथल्या जीवनशैलीचा आत्मा, हिंदी सिनेमाने व्यवस्थित जपला, जोपासला आणि प्रेक्षकांपुढे मांडला. जनमानसाच्या भावनांचा प्रतिध्वनीच या सगळ्या गाण्यांमधून ऐकू येतो आहे.
या लोककलेला स्वातंत्र्यदिनी मन:पूर्वक सलाम!
– अभ्यासू महाराष्ट्रीय
(फेसबुकवरुन साभार)