मुंबई-गोवा महामार्गावर बारा कोटीचा धुरळा

बांधकाम विभागाकडे जाणार दुरुस्तीची जबाबदारी; प्राधिकरणाकडे मनुष्यबळाची कमतरता

। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवा दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात आला. या दुरुस्तीसाठी चांगल्या दर्जाचे सिमेंट वापरल्याचा दावा केला जात होता. मात्र, पावसाळा संपताच या सिमेंटची माती झाली. तसेच नवीन तंत्रज्ञान वापरून देखील खड्डे बुजविण्याचा फार्स जणू फुसका बार ठरला.

सध्या पडणार्‍या ऊनामुळे या मातीचा धुरळा उडत आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या 84 किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 13 वर्षापासून रेंगाळले असल्याने मार्गाच्या दुरावस्थेने जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. महामार्गावर 30 फूट लांबीचे तर 3 फुटी खोल खड्डे पडलेले दिसतात. मात्र सरकार व प्रशासन जणू निद्रावस्थेत आहेत.

गौरी-गणपतीसाठी तळ कोकणात जाणार्‍यांच्या मागणीनुसार दरवर्षीप्रमाणे हे खड्डे भरण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावर्षी 8 कोटी रुपये खर्च केले होते, तर इंदापुरपासून पुढील 64 किलोमीटर यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 5 कोटी रुपये तात्पुरत्या स्वरुपात खड्डे भरण्यासाठी खर्च केले होते. यासाठी चांगल्या दर्जाच्या सिमेंटचा वापर केला गेला होता. या सिमेंटची पावसाळ्यातच माती झाली असून आता ती माती धुळीच्या स्वरुपात हवेत उडत आहे. पाऊस थांबल्यानंतर पडणार्‍या ऊनामुळे दुचाकी चालकांच्या नाका- तोंडात ही धुळ जात असल्याने दमा आदी आजार बळावलेत. या महामार्गावरुन आता प्रवास नकोसा वाटू लागला आहे. चाकाखालील खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात धुळीने श्‍वास घेण्यासही त्रास होतो.

दुरुस्तीची जबाबदारी पीडब्ल्युडीकडे जाणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने पहिल्या टप्प्याच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येणार आहे. या संदर्भात केंद्रीय स्तरावर चर्चा सुरु असून काही दिवसातच यावर निर्णय होणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. यापुर्वी वडखळ-अलिबागच्या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे.

प्राधिकरणाकडे अपुरे मनुष्यबळ
पनवेल येथील महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे विरार-अलिबाग कॅरीडोर (20 किमी) जेएनपीटी-चौक, जेएनपीटी-पळस्पे, मुंबई-गावा महामार्गाचा पहिला टप्प्याच्या कामातील समन्वयाची जबाबदारी आहे. यासाठी एक प्रकल्प संचालकासह दोन अभियंते पनवेल विभागात कार्यरत आहेत. यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे.

पहिल्या टप्प्यातील 42 किलोमीटरच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची निविदी प्रक्रिया काढण्यात आलेली आहे; तोपर्यंत डांबरीकरण करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना धुळीपासून होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.

यशवंत घोटकर
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

महामार्गावरुन प्रवास करताना धुळीमुळे श्‍वास गुदमरतो. डोळ्यात, नाकात, तोंडात धुळ जात असल्याने दुचाकीवरुन प्रवास करणे नकोसे होते. कपड्यांचा तर रंगच बदलतो. एकवेळ खड्डे परवडले पण ही धुळ नको, असे वाटते.

हरीचंद्र तेलंगे
प्रवासी

खड्डे बुजवून गणपतीचे दहा दिवसही रस्ता व्यवस्थित नसतो. तात्पुरते खड्डे बुजवण्यासाठी करोडो रुपये खर्च करुन काही दिवसातच त्रास होतो.

संजय यादवराव
प्रवासी
Exit mobile version