| पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील रस्त्यांची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्याचा नाहक त्रास वाहनचालक, भाविक तसेच दुकानदार व्यावसायिक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी सुधागड तालुका युवा सेना तालुका अधिकारी किरण पिंपळे यांनी शुक्रवारी (ता.4) पाली नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरूणकर यांना निवेदन दिले. यावर तत्काळ उपाययोजना करा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी दिला.
पाली हे अष्टविनायकातील एक देवस्थान असल्यामुळे दररोज येथे हजारो भाविक श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी येथे असते. याशिवाय, इतर वाहतूकही पाली हद्दीत मोठ्या प्रमाणात होते. मात्र, येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाली शहरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनाही याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
धुळीवर पाण्याचा उतारा
वारंवार धुरळा उडवून रस्त्याशेजारील घरे व दुकानात जातो. परिणामी, येथील प्रवासी, नागरिक, व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाय म्हणून काही रहिवासी व व्यापारी रस्त्यावर वारंवार पाणी मारतात. मात्र, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. तसेच उन्हाने रस्ता कोरडा झाल्यावर पुन्हा धुरळा उडतो.