कोकण रेल्वेची ठोकर लागून आईसह दोन मुलींचा मृत्यू

| माणगाव | वार्ताहर |

कोकण रेल्वेची ठोकर लागून आईसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना शुक्रवार पहाटे सव्वातीनच्या सुमारास माणगाव तालुक्यातील गोरेगाव लोणेरे येथे घडली. रिना जयमोहन नायर (वय -36) यांच्या मुली जिया जयमोहन नायर (वय-15) लक्ष्मी जयमोहन नायर (वय-12) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी ही आत्महत्या असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेची खबर नरेश सुभाष गायकवाड (वय -39) मूळ रा. गीरडा जि. बुलढाणा, सध्या रा. वरसगाव कोलाड ता. रोहा यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात दिली. या घटनेने गोरेगाव विभागासह संपूर्ण माणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे खरे कारण मात्र समजू शकले नाही.

सदर घटनेबाबत गोरेगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत रिना, जिया आणि लक्ष्मी यांना कोकणकन्या एक्स्प्रेसची ठोकर लागली. त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खंदारे करीत आहेत.

Exit mobile version