तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
| माणगाव | सलीम शेख |
माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे शनिवारी (दि.13) अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करून आपल्या चार मुलांनाही विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगा व एक मुलगी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खरवली आदिवासीवाडी येथील धर्मा जाधव यांची पत्नी आशा जाधव यांनी सकाळी थंड पेयामध्ये विष मिसळून प्रथम स्वतः प्राशन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना रवी जाधव, दुर्वा जाधव, नंदिनी जाधव आणि राजश्री जाधव यांनाही ते पेय पाजल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेत आशा जाधव यांच्यासह दुर्वा जाधव (वय 7) आणि नंदिनी जाधव (वय 4) यांचा मृत्यू झाला. तर रवी जाधव (वय 8) आणि राजश्री जाधव (वय 4) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर सर्वांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशु विशेषज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी मुलांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला.
प्राथमिक माहितीनुसार, मासे मारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी गोळी थंड पेयात मिसळून हे कृत्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या नैराश्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
एका क्षणात उद्ध्वस्त झाले कुटुंब
खरवली आदिवासीवाडीतील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत






