। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनीत एका आठवड्यात दोन ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाने आंबिवली येथील विजय सोनावळे यांच्या रूममध्ये भाडोत्री असलेला श्रीकांत वासुदेव राय (वय 30, रा. निरीशा जिल्हा वाकूर, राज्य पश्चिम बंगाल) याने किचनच्या छताच्या लोखंडी पाइपला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला ग्रामीण रुग्णालय चौक येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर कराडे बुद्रुक येथे कमाल दत्तात्रय भाऊ यांच्या चाळीतील रूममध्ये राकेश राधेश्याम चव्हाण (वय 23, बरकी गाव, जिल्हा वाराणसी, राज्य उत्तर प्रदेश) हा राहत होता. त्याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून तो राहत असलेल्या भाड्याच्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला चौक येथे ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.






