पाण्यावर हिरवागार तवंग
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात टाटा धरणाच्या पाण्यावर दुबार शेती केली जाते. या दुबार शेती सोबत उल्हास नदीच्या पाण्यात हिरवा थर दिसू लागला आहे. त्यामुळे नदी काठाचे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत. पाण्यावर हिरवा तवंग दिसू लागल्यामुळे नदी संवर्धनासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
टाटा धरण बांधल्यानंतर वीज निर्मितीसाठी पाणी कर्जत येथे सोडण्यात येऊ लागले. पुढे या पाण्यावर दुबार शेती करता येईल म्हणून 1960 च्या दशकात राजनाला कालवा खोदण्यात आला. त्यानंतर कर्जत तालुक्यातील 42 गावे ओलिताखाली आली. या भागात डिसेंबर महिन्यासाठी शेती करण्यास सुरुवात झाली आहे. साधारण 1500 हेक्टरवर भाताची शेती केली जाते. कालव्याचे पाणी हे पुढे पेज नदीमधून पुढे जाते. हि पेज नदीमध्ये उल्हास नदीला जाऊन मिळते आणि उल्हास नदी बारमाही वाहणारी नदी होते. मात्र कर्जत शहरातून पुढे येणारे पाणी हि प्रदूषित पाणी असल्याने उल्हास नदी कायम प्रदूषणाच्या विळख्यात कि शेतीमुळे पाण्यावर हिरवा तवंग दिसू लागला आहे. याबाबत उल्हास नदीच्या काठाचे रहिवाशी आणि शेतकरी हे चिंता व्यक्त करू लागले आहेत.
मागील काही वर्षी उल्हास नदीच्या पाण्यावर जलपर्णींची समस्या आढळून आली आहे. उल्हासनदी निर्मल समितीकडून जलपर्णी बाजूला करण्याचे आणि नदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषिरत्न शेतकरी शेखर भासवले यांच्याकडून देखील उल्हास नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यातच उल्हास नदीच्या पाण्यावर हिरवा तवंग दिसू लागल्यामुळे हा हिरवा तवंग नक्की कोणत्या कारणाने निर्माण झाला आहे याचा अभ्यास पर्यावरण प्रेमी यांच्याकडून होण्याची गरज शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. सध्या पाण्यावर दिसून येत असलेला हिरवा तवंग भातशेतीच्या पाण्यामुळे आहे कि अन्य कारणामुळे याबाबत प्रशासनाच्या भूमिकेकडे उल्हासनदी निर्मल अभियानांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.