| नागोठणे | वार्ताहर |
आपल्या शहरात वा परिसरात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पोलीस आपले काम करीत असतात एक जबाबदार व्यक्ती म्हणून पोलिसांना सहकार्य करा, 15 ते 18 या वयोगटातील आपली मुले मोबाईलवर काय करतात याकडे पालकांनी लक्ष द्यावे, सोशल मिडियावर कोणता संदेश पसरवतोय तो आधी पूर्ण वाचा, कोणतीही वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियावर टाकतांना सर्वांनी विशेषता तरूणांनी काळजी घ्यावी असे प्रतिपादन रोहाच्या पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम यांनी नागोठण्यातील शांतता समितीच्या बैठकीत दिला.
नागोठण्यात मुस्लीम समाजाच्या एक अल्पवयीन मुलगा व एक अल्पवयीन मुलगी यांनी मंगळवारी (दि.23) संध्याकाळी सोशल मिडियावर हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट टाकली होती. हे प्रकरण नागोठणे पोलिस ठाण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हिंदू-मुस्लिम समाजातील तरुण वर्ग व नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन शहरात अशांतता व कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर नागोठणे पोलिस ठाण्यात बुधवारी(दि.24) शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पोमन, विनोद पाटील, जिल्हा शांतता समितीचे सदस्य अशपाक पानसरे, किशोर म्हात्रे, बिलाल कुरेशी, अखलाक पानसरे, ज्ञानेश्वर साळुंखे, सचिन ठोंबरे, चेतन कामथे, बापू रावकर, नितीन राऊत, निलेश भोपी, जोएब कुरेशी आदींसह नागरिक उपस्थित होते.