वनविभागाकडून थातूरमातूर कारवाई; साग, जांभूळ, खैर, आंबा, शिरसची तोड
| रोहा । प्रतिनिधी |
रोह्यातील सानेगाव जंगल भागात खाजगी जागेत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे, वृक्षतोड करण्याचा परवाना न घेता येथिल शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल झाली परंतु वनविभाग प्रशासन सुस्त राहिले, तक्रारदाराने सातत्याने पाठपुरावा करीत कारवाईसाठी तगादा लावल्याने वन खात्याकडून अखेर नाममात्र कारवाई झाली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत त्याच्याकडून केवळ आठ हजार रुपये दंड जमा करण्यात आले आहे.
सानेगावमधील घनदाट जगंल भागात काही मालिकीच्या 32 हेकटर जागेमध्ये झाडांची तोड करण्याचा ठेका देण्यात आला, ठेकेदारांनी तोडकाम करताना लगत असलेल्या अन्य मालकीच्या जागेत देखील विनापरवाना झाडांची तोड केली. तोडकाम करण्यापूर्वी हद्द कायम न करता तसेच मालकांची परवानगी न घेता राजरोसपणे शेकडो झाडांची कत्तल केली गेली. खाजगी मालकीच्या जागेतील साग, जाभूळ, खैर, आंबा, ऐन ,शिरस इत्यादी झाडांची बेसुमार तोड करण्यात आली. याप्रकरणी जमीन मालक अमलकांत मोरे यांनी लेखी तक्रार दिली, त्यानंतरही वनविभाग प्रशासन ढिम्म राहिले, तक्रारदार यांनी सातत्याने पाठपुरावा करीत कारवाईसाठी तगादा लावल्याने अखेर वन खात्याने दोघां विरोधात थातूरमातुर कारवाई केली आहे. मागील 2 वर्षात या तोडकामाच्या माध्यमातून लाखो रुपये किंमतीच्या झाडांची तस्करी करण्यात आली आहे, वृक्षतोडीच्या कामाचा परवाना घेत असताना सातबारा उतार्यावरील असलेले काही जमीन मालक मयत असताना देखिल वारसनोंदी न करता केवळ साद्या कागदावर साह्य घेऊन संबधित ठेकेदाराला तोडकामाची परवानगी देण्यात आली आहे. असे आरोप तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते अंमलकांत मोरे यांनी केले आहेत.
खात्याकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे. याप्रकरणी कैलाश पांडुरंग जगंम व सतीश काशिनाथ म्हात्रे या विना परवाना तोडकाम करणार्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून आठ हजार रुपये दंड जमा करण्यात आले आहे.
मनोज वाघमारे, वन परीक्षेत्र अधिकारी, रोहा
सततची होणारी वृक्षतोड आणि लागणारे वणवे याबाबत वनविभागाची भूमिका ही संशय निर्माण करणारी आहे, याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने याविषयी लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन संबंधितांवर तातडीने सक्त कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
नितिन परब, रोहा सिटीझन फोरमचे.
वन खात्याच्या मर्जीनेच येथे शेकडो झाडांची तोड आणि तस्करी होत आहे, त्यामुळे तक्रार दिल्यानंतरही दिरंगाईने नाममात्र कारवाई करण्यात आली. या कारवाईने आपण समाधानी नसून वन मंत्री सुधीर मुंगटीवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करणार आहोत.
अंमलकांत मोरे, जमीन मालक