दुर्दैवी घटना! कळंबोलीत टॅंकरच्या अपघातात तरुणीचा नाहक बळी

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

कळंबोलीमध्ये तेलाचा टॅंकर पलटी होऊन अपघात झाला. टॅंकरमधील तेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले होते. याचेवळी या तेलावरून दुचाकी घसरली आणि तरुणीने नाहक जीव गमावल्याची दुर्दैवी घटना नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव राजनंदिनी जाधव (19) असे आहे.

नवी मुंबईतील कळंबोली सर्कल येथे तेलाचा टँकर पलटी झाला होता. त्यानंतर टॅंकरमधील तेल रस्त्यावर सांडले होते. या रस्त्यावरून एक तरुणी दुचाकीवरून जात होती. याच रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून तिची दुचाकी घसरली. या घटनेत तरुणीला गंभीर दुखापत झाली त्यामुळे राजनंदिनी जाधवचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले, त्यानंतर कळंबोळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी फोमच्या सहाय्याने रस्ता धुतला. यामुळे रस्त्यावर सांडलेले तेल कमी झाले. मात्र या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तसेच वाहतूक हळूहळू सुरळीत करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

Exit mobile version