थंड पाण्यासाठी जागोजागी बसविली मातीची भांडी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला आहे. उन्हांच्या काहिलिने सारे त्रस्त आहेत. अशातच ताम्हिणी घाटात पशु पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी अनोखी शक्कल लढवली असून थंड पाण्यासाठी जागोजागी मातीची भांडी बसवली आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट जैवविविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यातील विळे, भिरा, पाटणुस व भागाड या गावालगत हा घाट परिसर आहे. असंख्य पशूपक्षांच्या प्रजाती येथे नांदत आहेत. मात्र उन्हाळ्यात त्यांची पाण्यासाठी वणवण होते. ही बाब लक्षात घेऊन काही निसर्गप्रेमींनी येथील पशुपक्षांसाठी जागोजागी मातीची भांडी बसवली आहेत. यामुळे येथील पशुपक्षांची वणवण तर थांबली आहेच. शिवाय त्यांना थंड पाणी सुद्धा मिळत आहे.
ताम्हिणी घाट पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत निसर्गसौंदर्याने नटलेला असतो. पावसाळ्यात असंख्य धबधबे येथून वाहतात. परंतु उन्हाळा सुरु होतो. आणि ताम्हिणी घाटाला नजर लागते आणि भयंकर असे वणवे लावल्यामुळे आगीच्या ज्वालांनी सह्याद्री व ताम्हिणी घाटाचे सौंदर्य विद्रुप होऊन जाते. शिवाय येथील अनेक पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र लुप्त होतात. त्यातच शिशिर ऋतूत आणि वैशाख महिन्यात झाडांची पानगळती झाल्याने अन्नपाण्यासाठी या घाटातील पक्षी, प्राणी कीटक यांचा मोर्चा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या विळे, भागाड, पाटणुस, भिरा आदी गावामध्ये, मग कोणालातरी बिबट्याचे दर्शन होते तर कोणाला भेकर, चौशिंगा, मोर लांडोर, काळगे, उद मांजर अशा प्राण्यांचे व विविध पक्षांचे दर्शन होते. या प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबावी व अपघात देखील रोखावेत या उद्देशाने काही अज्ञात व्यक्तींनी ताम्हिणी घाटात विविध ठिकाणी मातीची भांडी सिमेंटच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित बसवलेली आहेत.