वीजपुरवठा खंडित, बाजारपेठ ठप्प
| माणगाव | प्रतिनिधी |
गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या माणगाव तालुक्यावर शनिवारी दुपारी अचानक वादळी पावसाने आसूड ओढले. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करताच क्षणार्धात संपूर्ण परिसरात वादळी पाऊस कोसळला. विजेच्या कडकडाटासह थैमान घालणाऱ्या या अवकाळी पावसाने तब्बल दीड तास तालुक्याला झोडपून काढले. या अनपेक्षित संकटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
वादळी पावसाच्या तडाख्यात वीजपुरवठा दरम्यानच्या काळात खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अचानक आलेल्या या संकटाने सर्वसामान्य नागरिकांची पूर्णपणे धांदल उडाली. तालुक्यातील प्रमुख बाजार पेठही या पावसामुळे ठप्प झाली. व्यापारी व ग्राहक दोघेही आडोसा शोधत पांगले. दुकाने, हातगाड्या व उघड्यावरील व्यवसायांचेही नुकसान झाले. वादळी पावसामुळे तालुक्यात नेमके किती नुकसान झाले याची सविस्तर माहिती मात्र उशिरा पर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झाली नव्हती. विशेष म्हणजे हा पाऊस केवळ शनिवारपुरताच मर्यादित नव्हता. माणगाव तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सलग पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी दोघेही चिंताग्रस्त झाले आहेत.
एवढ्यावरच न थांबता, हंगामाच्या अखेरीस उरलेल्या आंबा पिकाचेही या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरीही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून, या दुहेरी संकटाने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत शेतकऱ्यांची मागणी संकटग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने वारंवार होणाऱ्या नुकसानी मुळे त्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहे.
हवामानातील बेभरवशाच्या बदलांनी कोकणातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना, ज्यांनी या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते, ते लोकप्रतिनिधी आणि शासन मात्र थंड बस्त्यात बसून आश्वासनांचे बुडबुडे सोडण्यातच धन्यता मानत आहे. अवकाळी पाऊस, वादळ, लांबलेला पावसाळा आणि ढगाळ वातावरण यांचे एकापाठोपाठ एक तडाखे बसत असताना कोकणातील शेतकऱ्याची शेती, फळबागा आणि स्वप्नेही धुळीस मिळत आहेत. या नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही निसर्गाने हिरावून घेतला आहे. एका बाजूने निसर्ग आसूड ओढतो आहे, तर दुसऱ्या बाजूने शासनाची उदासीनता या बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. कोकणाचे वैभव म्हणून ओळखले जाणारे हापूस आंबा आणि काजू ही दोन महत्त्वाची फळपिके यंदा हवामान बदलाच्या फेऱ्यात पूर्णपणे होरपळून निघाली. यावर्षी तब्बल 90 टक्के आंब्याचे नुकसान झाले असून केवळ दहा टक्के पीकच शेतकऱ्याच्या हाती लागले. ज्या हापूस आंब्याच्या भरवशावर कोकणातील हजारो शेतकरी कुटुंबे वर्षभराचा संसार चालवतात, तो आंबाच यंदा शेतकऱ्याला दगा देऊन गेला. काजू बागायतदारांचीही हीच परवड झाली असून वादळी पाऊस आणि अवकाळी पर्जन्यवृष्टीने काजूच्या बागाही उध्वस्त झाल्या. नुकसान झाले, पंचनामे सुरू झाले, आश्वासने मिळाली आणि त्यानंतर शेतकरी फक्त वाट पाहत राहिला.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
भात व आंबा पिकांचे नुकसान या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो तालुक्यातील शेतकरी वर्गाला पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने रब्बी हंगामातील भात पीक अजूनही तालुक्याच्या विविध भागांत शेतात उभे आहे. वादळी पावसाच्या तडाख्याने काही ठिकाणी हे उभे भात पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आधीच कर्जाच्या ओझ्या खाली दबलेला आणि मेटाकुटीला आलेला शेतकरी या संकटाने पुन्हा एकदा उध्वस्त झाला आहे.
