मंत्रालयापर्यंत पायी मोर्चाचे आयोजन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाविरोधात दि.5 जून रोजी मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जनजागृती म्हणून दि.20 मे पासून कर्जत तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन कर्जतमध्ये पर्यावरण संवर्धन बचाव समिती कार्यरत असून, या समितीकडून या तिन्ही प्रकल्पांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे.
कर्जत तालुक्यात येत असलेल्या टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाबाबत काय भूमिका घ्यायची? यासाठी कर्जत बचाव समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ॲड. कैलास मोरे, जि.प. सदस्य बाबू घारे, तसेच जगदीश ठाकरे, प्रवीण गांगल, मोहन ओसवाल, नितीन परमार, रंजन दातार, ॲड. संदीप घरत, संदीप बोराडे, सतीश मुसळे आदींसह स्वीकृत नगरसेवक राजाभाऊ कोठारी, ॲड. रवींद्र गायकवाड, डॉ. प्रशांत सदावर्ते, धर्मेंद्र मोरे, कृष्णा जाधव, विजय बेडेकर आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲड. कैलास मोरे यांनी, टोरंट जल विद्युत प्रकल्प होऊ नये म्हणून जनहित याचिका दाखल करण्याचे काम सुरु आहे, लवकरच ती दाखल करण्यात येईल. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि.5 जून रोजी कर्जत ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी जनजागृती म्हणून कर्जत येथे दि.20 मे पासून धरणे आंदोलन करावे लागेल. एक कोअर कमिटी स्थापन करून निर्णय घेणे सोपे पडेल. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या खर्चासाठी आर्थिक मदत एकत्र करून ही याचिका दाखल करण्यात येईल, असा निर्णय कैलास मोरे यांनी जाहीर केला.
