पोस्टरबाजीने आक्षी ग्रामस्थ हैराण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या शब्दानुसार आक्षी गावातील मंजुर असलेल्या अंतर्गत रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे लक्षात येताच आक्षीच्या सेनेच्या बिनकामी माजी सरपंचाने आंदोलनाचा कांगावा करीत पोस्टरबाजी सुरु केली आहे. त्यामुळे हैराण झालेले आक्षी ग्रामस्थ स्टंटबाजी करण्यापेक्षा एखादे तरी विकास कामे करा किंवा बेरोजगारांना दिलेल्या नोकरीचे आश्वासन तरी पुर्ण करा अशी टोलेबाजी करीत आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आक्षी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार आक्षी स्तंभ ते साखर कोळीवाडा साई मंदिर आक्षी बीचपर्यंतचा अडीच किलोमीटर रस्ता मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्याआधी 700 ते 800 मीटरच्या रस्त्याचे खडीकरण यापूर्वीच झालेले आहे. तसेच पावसामुळे थांबलेल्या उर्वरित रस्त्याचे दिवाळीनंतर काम चालु देखील होणार आहे, त्यासाठी लागणारे मटेरियल देखील पडले आहे. या सर्व वरील विषयांचा पाठपुरावा शेकापने वारंवार केलेला आहे. साहजिकच त्याचे श्रेय शेकापक्षाला जाताना स्पष्ट दिसत आहे. शेकापक्षाच्या माध्यमातून पुर्णत्वास जात असल्याने आक्षीच्या सेनेच्या बिनकामी माजी सरपंचाने पोटदुखीस सुरुवात झाली आहे. शेकापला श्रेय जातेय हे लक्षात आल्यावर या सेनेच्या बिनकामी माजी सरपंचाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेची दिशाभुल करण्याचा त्याने केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे हैराण ग्रामस्थ नाक्यानाक्यावर चर्चा करीत कागदी घोडे नाचवण्यापेक्षा गावात एखादेतरी विकासकामं आणून दाखवा असे बोलत आहेत.
सदर रस्त्याचे 700 ते 800 मीटर खडीकरण पावसाळ्यापुर्वी झाले असून, कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे वेळेवर साधन सामुग्री तसेच कामगार उपलब्ध नव्हते. त्यातच डांबर प्लांट बंद म्हणून या कामाला उशिर झाला आहे. मटेरियल पडल्यानंतर दिवाळीनंतर रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात होईल हे लक्षात येताच सेनेच्या या बिनकामी माजी सरपंचाने स्टंटबाजी सरु केली. सेनेच्या आमदाराने निवडणूकीदरम्यान तीन महिन्यात मतदारसंघातील 15 हजार नोकर्या देतो असे आश्वासन दिले होते. ते आधी पुर्ण करा. आज बेरोजगारीमुळे अलिबाग मुरुड मध्ये हजारो तरुण बेरोजगारीमुळे रडत आहेत, त्यांच्यावर आत्महत्येची वेळ ओढवली आहे. हिम्मत असेल तर ते पुर्ण करुन दाखवा असे आव्हान शेकापचे युवा कार्यकर्ते विनायक पाटील यांनी दिले आहे.
पक्षाचा आमदार आणि सरकार असतानाही आक्षीचा रस्ता तीन महिन्यात करुन देतो असे खोटे आश्वासन देऊन एक साधा रस्ता मंजुर करता आला नाही हे अपयश लपविण्यासाठी आक्षीच्या बिनकामी सेनेच्या माजी सरपंचाने केलेला खटाटोप आक्षीतील शिवसैनिकांच्या लय जिव्हारी लागला नाक्यानाक्यावर दबक्या आवाजात चर्चा सुुरु असल्याचेही विनायक पाटील यांनी म्हटले आहे.