महापालिकेतील निविदा प्रक्रियेत एआयचा वापर करा

मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

| मुंबई | प्रतिनिधी |

महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर लक्ष राहिल, कामाची अंमलबजावणी प्रभावी होईल, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

राज्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला राज्य मंत्री मंडळाने मंजूरी दिली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने काम करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, महाआयटीचे संचालक संजय काटकर, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका भूवनेश्वरी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महापालिका दैनंदिन कामकाजात एआयचा वापर कशा पध्दतीने करते आहे, याचे सादरीकरण महापालिकेतर्फे करण्यात आले. नालेसफाईमध्ये पारदर्शकता यावी, म्हणून तसेच नागरी सेवांमध्ये पारदर्शक व गतिमानता यावी म्हणून एआयचा वापर करण्यात येत असल्याचे सादरीकरण करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारी चॅट बॉट या एआय तंत्रज्ञानामार्फत विभाग कार्यालयात संकलित करण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले. मात्र यामध्ये एआयचा वापर करुन अधिकची सुधारणा करा व कोणत्याही महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तक्रार त्याने बोलल्यानंतर तो व्हिडीओ रेकॉर्ड होऊन तो व्हिडीओ संबंधित विभागकडे जाईल व त्यावर कारवाई तातडीने कारवाई अथवा कार्यवाही होईल, कशा पध्दतीने नियोजन करा. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मंत्रालयात ई-फाईल व ई-स्वाक्षरी ची संकल्पना प्रभावीपणे राबवली आहे; त्याच पध्दतीने मुंबई महापालिकेत ही संकल्पना राबवा व पेपरलेस कारभाराच्या दृष्टीने कामकाज होईल, याचे नियोजन करा. तसेच, टेंडर पद्धतीमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक आहे. महापालिका टेंडरमध्ये अनेकवेळा व्हेरिएशन केले जाते; त्यावर एआय नियंत्रण आणा, जेणेकरून नागरिकांना अशा पध्दतीने झालेल्या कामांची माहिती मिळू शकेल. तसेच, व्हेरिएशनमध्ये करण्यात आलेला निर्णय योग्य आहे की नाही हे एआयमार्फत स्पष्ट होईल, अशा पध्दतीचे नियोजन करा, अशा सूचाना मंत्री ॲड. शेलार यांनी केल्या.

महापालिकेच्या कामकाजात नागरिक सहभागिता वाढावी, तरुणांच्या नवनवीन कल्पना समजून त्याचा वापर प्रशासनामध्ये करता यावा, यासाठी तरुणांची हे हॅकेथॉन आयोजित करा.

– मंत्री शेलार

Exit mobile version