। मुंबई । प्रतिनिधी।
आयसीसी 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या दुसर्या सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने अवघ्या 17 चेंडूत हा सामना जिंकला आहे. दरम्या मलेशियाचा संघ अवघ्या 31 धावांत गारद झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने 2.5 षटकांत 32 धावांचे लक्ष्य गाठले. भारतीय संघासाठी सलामीवीर जी त्रिशाने 12 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. तर, भारताच्या या ऐतिहासिक विजयात वैष्णवी शर्मा हिने मोलाचा वाटा उचलला. तिने या सामन्यात हॅटट्रिक घेत 5 धावादेत एकूण 5 बळी घेतले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेपर्यंत मलेशिया संघाने 4 बळी गमावले होते. भारताच्या जोशिताने मलेशियाला सुरुवातीचा धक्का दिला. यानंतर आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा या डावखुर्या फिरकीपटूंनी जणू धुमाकूळच घातली. आयुषी आणि वैष्णवीने मिळून 13 धावांत 8 बळी घेतले. आयुषीने 8 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडले आणि वैष्णवीने 5 धावा देत 5 बळी घेतले. वैष्णवीचा हा पदार्पणाचा सामना होता आणि तिने हॅट्ट्रिकसह कारकिर्दीतील पहिले 5 बळी घेत इतिहास घडवला आहे. वैष्णवी शर्मा व्यतिरिक्त आयुषी शुक्लाने 3 बळी घेतले तर, जोशिताने 1 बळी घेतला.
त्यांनतर भारताकडून फलंदाजी करताना गोंगडी त्रिशा आणि जी कमलिनी या सलामीच्या जोडीने एकही बळी न गमावता आपल्या संघाला 2.5 षटकांतच विजय मिळवून दिला. गोंगडी त्रिशाने 12 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावांची तुफानी खेळी केली. तिने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. तर, कमलिनी 4 धावा करून नाबाद राहिली. आणि भारतीय संघोन 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. याआधी भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला सामना 9 गडी राखून जिंकला होता. त्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले होते. आता भारतीय संघाला आपला पुढचा तिसरा सामना 23 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. ‘अ’ गटातून भारतासह श्रीलंकेचा संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता या दोघांमध्ये गटातील टॉपर होण्यासाठी स्पर्धा होणार आहे.