। तळा । वार्ताहर ।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी उसर गावातील नदीवर वनराई बंधारा बांधला. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी वनराई बंधार्याचे नियोजन करून सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये वनराई बंधारा बांधून पूर्ण केला. यावेळी सायली घाग, गीता गुजर, अनंत घाग गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.
मनोज सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत नदीचे महत्व, प्लास्टिक टाळा कापडी पिशव्यांचा वापर करा, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत करा, शोष खड्ड्यांचा वापर करा, वनराई बंधारे बांधून झाडांची लागवड करा, शेतीला पूरक सेंद्रिय शेतीचा उपक्रम सुरू करा. अशा अनेक उपक्रमांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी हा वनराई बंधारा बांधून पूर्ण केला. बंधारा बांधल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची विद्यालयाकडून व्यवस्था करण्यात आली. पर्यावरण संवर्धन व चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत हा वनराई बंधारा बांधण्यात आला.