4 दिवस पावसाचे
पुणे | प्रतिनिधी |
मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. सोमवारपासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे.ऐन दिवाळीतही वरुणराजा जोरदार पावसाची आतषबाजी करणार असल्याचा अंदाज मध्यवर्ती हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पुढील चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने उद्या सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मंगळवार पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारी राज्यात सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, रायगड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
त्यानंतर, 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवशी पुण्यात देखील जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. या दोन दिवसासाठी पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.