घाऊक बाजार आवारातच भाजीपाल्याच्या दरात तफावत
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई एपीएमसी घाऊक बाजार आवारात भाजीपाल्याला दोन दर आकारले जात असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय बाजार समिती प्रशासन प्रसिद्ध करत असलेले दर आणि मुळात बाजार आवारात असलेले दर यात तफावत असल्याचे समोर आले आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 550 गाड्यांची आवक झाली असून घाऊक बाजारात प्रत्येक भाज्यांची दर 15 ते 40 रुपये किलो विक्री केली जात आहे. मात्र याच मार्केटमधील डी पाकळीमध्ये दुप्पट आणि तिप्पट दराने भाजीपाला विक्री केली जात आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरमध्ये ग्राहकांना 100 रुपये किलो दराने भाजीपाला खरीदी करायला लागत आहे.
शेतकर्यांना मातीमोल भाव देणारे व्यापारी आणि ग्राहकांना मात्र अधिक पटीने भाजीपाला विकत घ्यावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे शेतकरी उध्वस्थ होत चालला आहे, तर दुसरीकडे सामान्य ग्राहक महागाईने बेजार झाला आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये शेतकरी आणि ग्राहकांमध्ये ही निर्माण झालेली लॉबी कोणाच्या आशीर्वादाने हे काम करते असा सवाल केला जात आहे. तर बाजार समिती प्रशासन यावर गप्प का? तर बाजार समितीवर निवडून आलेले शेतकरी प्रतिनिधी नक्की काय करत आहेत असा सवाल देखील विचारला जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्याला हमीभाव मिळत नाहीय. शेतकर्याने पाठवलेल्या शेतमालाची लाखो रुपये थकबाकी वर्षानुवर्षे व्यापारी ठेवत आहेत. पैशांसाठी शेतकरी फक्त हेलपाटे घालताना दिसत आहेत. बाजार समितीला योग्य सेस सुद्धा मिळत नाही.
मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात सध्या जवळपास 600 गाड्यांची आवक होत आहे. बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारसमितीमध्ये घाऊक भाजीपाला मार्केट आहे. घाऊक बाजारात चार पाकळ्या आहेत.
घाऊक बाजारात कमी दराने मालाची विक्री केली जाते. मात्र, त्याच ठिकाणी किरकोळ मार्केटमध्ये दुप्पट भावाने माल विकला जातो. एकीकडे कमी किंमतीला विकला जाणारा माल तर दुसरीकडे मात्र हाच माल दुप्पट किंमतीच्या भावाने विकला जातो.
या बाबतीत बाजारात काही व्यापार्यांना विचारपूस केली असता व्यापार्यांनी सांगितले की, बाजार समितीमध्ये संचालकांनी डी पाकळीमधील भाजीपाला किरकोळ भावात विकण्यासाठी सूट दिली आहे. शिवाय या व्यापार्यांकडून बाजार समितीचा सेस भरणा होत नाही.
यामुळे प्रतिदिन जवळपास सरासरी 600 गाड्यांची आवक होऊन देखील बाजार समितीकडे 20 टक्के सेस जमा होत आहे. त्यामुळे मार्केट संचालकांनी काही व्यापार्यांना घेऊन बाजार समिती संपण्याच्या मागे असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर पणन मंत्री आणि मार्केट सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.