| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली वसाहतीमध्ये चारचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येचा मेळ घालताना पार्किंगसाठी कसरत करावी लागत आहे. सिडकोने बनवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड म्हणून 1980-84 च्या दरम्यान कळंबोली वसाहतीची निर्मिती झाल्यानंतर लोकवस्ती विस्तारली आहे. पण भविष्यात वाढणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ नसल्याने कोंडीचे विघ्न उद्भवत आहे.
कळंबोली वसाहतीमधील जवळपास दहापैकी एका घरांत आता चार तसेच दुचाकी वाहन आहे. अशातच कळंबोली वसाहतीमधील रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वसाहतीमधील नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशातच वसाहतीमधील बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागा आणि वाहनांची संख्या ताळमेळ बसत नसल्याने मोठ्या वाहनांच्या पार्किंगची मोठी जटिल समस्या झाली आहे. वाहनांची संख्या जास्त, तर त्यांच्या पार्किंगला जागा तोकड्या आहेत. ज्या जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी स्थानिकांच्या वाहनांना त्या वापरल्या जात आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय नसल्याने भविष्यात हा प्रश्न अधिक जटिल होणार आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये खरेदीसाठी दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. बाजारपेठेत एकाही ठिकाणी पार्किंगची सोय नाही. मात्र, वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर शहरातील व्यापाऱ्यांकडून वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे नवीन वाहन त्याच दाटीवाटीत लावून खरेदीला निघून जातात. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होते. सध्या वसाहतीमध्ये जवळपास घरोघरी वाहन आहे. त्यामुळे त्यांच्या पार्किंगचा प्रश्न जटिल होत आहे. रात्री एखादी दुर्घटना झाल्यास पार्किंग केलेल्या वाहनांचा मदतकार्यात अडथळा होताना दिसतो. त्या वाहनांच्या गर्दीतून वाट शोधत मदतकार्य राबवावे लागते. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत कठीण स्थिती होते. त्याचा पूर्वानुभव प्रशासकीय पातळीवर पालिका, पोलिसांनाही आहे.
वसाहतीमधील काही गृहसंकुलामध्ये खासगी पार्किंगची सोय आहे. परंतु, पालिकेनेही पुढाकार घेऊन पालिकेच्या मोकळ्या जागेत पालिकेतर्फे मोठ्या वाहनांच्या पार्किंगची सोय करावी. त्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमून त्याची निविदा काढून तो उपक्रम राबविल्यास सोयीस्कर होईल. मोकळी जागा आहे. तेथे व्यवस्था करून पालिकेला उत्पन्नासह वाहतूक कोंडी दूर होण्यास हातभार लागेल.