| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याचा आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. मुंबईनं पहिल्या दिवशी सर्वबाद 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भानं पहिल्या डावात सर्वबाद 105 धावा केल्या आहेत. या सामन्यावर मुंबईनं आपली पकड मजबूत केली असून पहिल्या डावात त्यांनी 119 धावांची आघाडी घेतलीय. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलाणी आणि तनुष कोटीयन यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. विदर्भाकडून यश राठोडनं सर्वाधिक 27 धावांचं योगदान दिलं.
शार्दुल ठरला तारणहार
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणाऱ्या शार्दुल ठाकुरनं अंतिम सामन्यातही अर्धशतक झळकावलं. शार्दुलनं 75 धावा केल्या तर पृथ्वी शॉनंही 46 धावा केल्या आहेत. भूपेन लालवानीनं 37 धावा केल्या आहेत. याच्याशिवाय मुंबईच्या इतर कोणताही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी 3-3 बळी घेतले. फलंदाजीसाठी आलेल्या विदर्भाची सुरुवात खराब झाली. डावाच्या तिसऱ्याच षटकात शार्दुल ठाकुरनं सलामीवीर ध्रुव शौर्यला बाद केलं. यानंतर धवल कुलकर्णीनं 2 बळी घेतले. परिणामी पहिल्या डावात विदर्भ काहीसा अडचणीत सापडलाय. 33 धावांवर त्यांचे 3 फलंदाज आऊट झाले असून ते 193 धावांनी पिछाडीवर आहेत. सलामीवीर अर्थव तायडे (22) आणि आदित्य ठाकरे (2) हे दोघं सध्या खेळत आहेत.
42व्या विजेतेपदाकडे नजर
यंदाचा अंतिम सामना महाराष्ट्रातीलच दोन संघांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे 53 वर्षांनंतर एकाच राज्यातील दोन संघात रणजीचा अंतिम सामना होत आहे. तब्बल 48व्यांदा रणजीचा अंतिम सामना खेळणाऱ्या मुंबईचा सामना विदर्भाशी होणार आहे. अजिंक्य रहाणेसारख्या कुशल कर्णधाराच्या नेतृत्वाखालील मुंबईची नजर 42व्या विजेतेपदाकडे आहे.







