अतिरिक्त गावांचा भार कार्यरत पोलीस पाटलांवर; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
| रायगड | प्रमोद जाधव |
अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाला थेट जनतेपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात पोलीस, महसूल विभाग आणि नागरिक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटील पदांची रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्तता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मंजूर असलेल्या एक हजार 989 पदांपैकी तब्बल एक हजार 121 पदे रिक्त असल्याने अकराशेहून अधिक गावे सध्या पोलीस पाटीलविना आहेत. परिणामी, कार्यरत पोलीस पाटील यांच्यावर अतिरिक्त गावांचा भार पडत असून, ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनावर ताण वाढला आहे.
गाव, वाड्या-वस्त्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण भागात पोलीस पाटील हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. एखादी घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीस ठाणे तसेच महसूल प्रशासनाला देण्याची जबाबदारी पोलीस पाटील पार पाडतात. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील मध्यस्थ दुवा म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
रायगड जिल्ह्यात एकूण दोन हजार 118 महसुली गावे असून ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारांहून अधिक आहे. मात्र, एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी सध्या केवळ 868 पोलीस पाटील कार्यरत आहेत. गावांमधील कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांची माहिती, महसूल प्रशासनाला मदत, निवडणुकांमधील सहकार्य, आपत्कालीन परिस्थितीत मदत, शांतता राखणे, दरोडे किंवा इतर गुन्हेगारी प्रकारांवर लक्ष ठेवणे, गैरवर्तन अथवा दुर्लक्षाच्या घटनांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पोलीस पाटील पार पाडतात. ग्रामीण भागात शांतता आणि सामाजिक समन्वय टिकवून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
मात्र, मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने एका पोलीस पाटील यांच्याकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे गावांमधील गुन्हेगारी घडामोडी, कायदा व सुव्यवस्थेची माहिती आणि अन्य प्रशासकीय बाबी वेळेत पोलीस व महसूल विभागापर्यंत पोहोचवताना कार्यरत पोलीस पाटील यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारीचा प्रश्नही अधिक गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील सात उपविभागीय कार्यालयांच्या अखत्यारित मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अलिबाग, कर्जत, माणगाव, रोहा आणि महाड उपविभागीय कार्यालयांत दीडशेहून अधिक पदे रिक्त आहेत. तर श्रीवर्धन आणि पनवेल येथे शंभरहून अधिक पदे रिक्त असून, पेण उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारित 95 पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
मार्गदर्शनाच्या विळख्यात भरती प्रक्रिया
रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, या भरती प्रक्रियेबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया मार्गदर्शनाच्या विळख्यात अडकून पडल्याची चर्चा असून, अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
रिक्त पदांवर दृष्टीक्षेप
| उपविभाग कार्यालय | मंजूर | भरलेली- | रिक्त |
| अलिबाग – | 275 | 120 | 155 |
| पेण – | 168 | 73 | 95 |
| पनवेल – | 207 | 93 | 113 |
| कर्जत – | 357 | 189 | 169 |
| माणगाव – | 270 | 101 | 169 |
| रोहा – | 282 | 122 | 152 |
| महाड – | 273 | 121 | 152 |
| श्रीवर्धन – | 157 | 49 | 108 |
| एकूण- | 1989 | 868 | 1121 |
रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी संघाच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरून माहिती मागविण्याचे कामही करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत ही पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलीस पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण पडत आहे. शासनाने ही पदे तात्काळ भरावीत.
विकास पाटील,
अध्यक्ष, रायगड पोलीस पाटील संघ
सुरेश घरत,
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तरुण बेरोजगार आहेत. बेरोजगारीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. फक्त नोकऱ्यांची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटीलांची रिक्त पदे शासनाने तात्काळ भरावीत.
तालुका चिटणीस, शेकाप
