जिल्हा रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार; सर्वत्र संताप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दिव्यांग दाखल्यावर सही करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सायंकाळी उशिरापर्यंत न आल्याने जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी येणार्या दिव्यांगांची अक्षरशः अवहेलना सुरु असून जिल्हाभरातून येणार्या दिव्यांगांना दाखल्यासाठी 18-18 तास प्रतिक्षा करावी लागत असल्याने जिल्हा रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. पोलादपूर, म्हसळा, उरण, माणगाव, तळा, खालापूर आदी जिल्ह्यातील सर्वदूरवरून दिव्यांग दाखल्यांसाठी आलेल्या दिव्यांगांची होत असलेली परवड पाहून संताप व्यक्त केले जात आहे. एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक बंद असल्याने दाखल्यांसाठी रात्री 10 -11 वाजेपर्यंत थांबावे लागल्याने पुन्हा प्रवास कसा करायचा असा मोठा प्रश्न दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांना पडला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समुळे उशिर झाल्याने दाखले द्यायला उशिर होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी सांगितले.
आठवड्यातील बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना दाखले देण्यात येतात. त्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून दिव्यांग अलिबाग येथे येत असतात. मात्र गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे एसटी बस सेवा बंद असल्याने मिळेल त्या खाजगी वाहनाने अलिबागला येणार्या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठया त्रासातून जावे लागत आहे. वेळेत पोहचून आपला नंबर लागण्यासाठी पहाटे 3 वाजता घर सोडून अलिबाग येथे पोहचणार्या अपंगांना 18 तास प्रतिक्षा करुन देखील दिव्यांगांचा दाखला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. काही दाखले दिल्यानंतर पुन्हा गायब झालेल्या जिल्हा शल्यचिकीत्सकांची बराच वेळ वाट पाहूनही ते येत नसल्याचे दिसून येताच दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांचा सयंम सुटला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ सुरु झाला होता. बराच वेळ आरडा ओरडा करुन जाब विचारला जात असल्याने अखेर जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित झाले. त्यानंतर पुन्हा दिव्यांगांची तपासणी करुन दाखले वाटप सुरु करण्यात आले. मात्र उशिर झाल्याने रात्री 10 ते 11 वाजण्याची शक्यता दिव्यांगांनी व्यक्त करतानाच आपल्यासोबत आलेले खाजगी वाहन चालक देखील वैतागले असल्याचे सांगितले. तर काहींना एवढया उशिरा परत कसे जायचे असा प्रश्न पडला.
या संदर्भात राज्याचे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे अलिबागला येजा करणे परवडत नाही. त्यात वाहन उपलब्ध होत नसल्याने परत जाण्यासाठी फार मोठे हाल होत असून किमान सायंकाळी 4 वाजेपर्यंत दाखल्यांचे वितरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
![](http://krushival.in/grygrars/2021/12/IMG20211208193307-1024x768.jpg)