नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पॅरिस येथे 1900मध्ये भारताचे ऑलिम्पिकमध्ये पदार्पण झाले. त्यानंतर 121 वर्षे उलटली तरीही बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील भारताच्या पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाचा शोध सुरूच आहे. यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्या एम. सी. मेरी कोम, अमित पांघल यांच्यासह भारताच्या एकूण नऊ शिलेदारांपैकी एक जण तरी हा पराक्रम करेल, अशी आशा आहे.
भारतात आजही बॉक्सिंगला ठरावीक भागांतच उत्तम प्रतिसाद लाभतो. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पहिल्या बॉक्सिंगपटूला खेळताना पाहण्यासाठी 1948पर्यंत वाट पाहावी लागली. मनोज पिंगळे, डिंको सिंग, गुरचरण सिंग यांसारखे प्रतिभावान बॉक्सिंगपटू भारताने घडवले. अखेर 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने 75 किलो वजनी गटात भारतासाठी या क्रीडाप्रकारातील पहिले पदक जिंकले. पुढे मेरी कोमने 2012च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून देशासाठी ऑलिम्पिक पदक पटकावणारी पहिली महिला बॉक्सिंगपटू ठरण्याचा मान मिळवला. मेरीची कामगिरी भारतातील बॉक्सिंगचे नशीब पालटणारी ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल आणि सहा वेळची जगज्जेती मेरी कोम यांच्याकडून संपूर्ण देशवासीयांना पदकाची अपेक्षा आहे. विशेषत: 38 वर्षीय मेरीचे हे कारकीर्दीतील अखेरचे ऑलिम्पिक ठरण्याची शक्यता असल्याने भारताला बॉक्सिंगमधील पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावून देण्याची मदार तिच्यावर असेल. याशिवाय सलग दोन आशियाई सुवर्णपदके कमावणारी पूजा राणीसुद्धा पदकाची दावेदार आहे. विकास कृष्णन, सिमरनजीत कौर धक्कादायक कामगिरीची नोंद करू शकतात.