वाकण, पाली, खोपोली वाहतूक पुन्हा सुरू

पुराचे पाणी ओसरले

| पाली/बेणसे | वार्ताहर |

पाली सुधागडसह जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली परिणामी गुरुवारी (दि.25) पहाटे दोन वाजल्यापासून वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलापासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. दुपारी दोन नंतर देखील ही वाहतूक ठप्प होती. तसेच अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अखेर 16 तासाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाली अंबा नदी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी प्रवाशी आणि वाहन चालकांची खूप फरफट झाली.

पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला जोड रस्त्यावर सखल भागात पाणी भरले होते. हे पाणी पाली मिनीडोअर स्टँड तसेच उन्हेरे फाटा इथपर्यंत आले होते. यामुळे येथील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच याच मार्गावर खोपोली बाजूकडे मोर टाक्याजवळ देखील रस्त्यावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक खोळंबली होती. दुपारी बारा नंतर पाणी ओसरल्यावर येथून वाहतूक सुरू झाली. पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणी असल्यामुळे ही वाहने पुन्हा त्या ठिकाणी अडकून पडली. यावेळी खाजगी वाहने, एसटी, ट्रक आदी मालवाहू, दुचाकीस्वार व प्रवासी व चाकरमानी अडकून पडले होते.

Exit mobile version