अवकाळीने रायगडला झोडपले
| अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार एंट्री मारली. रायगड जिल्ह्यातील काही भागात झाडे कोलमडून पडली. नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला. अनेकांच्या घरात पाणी शिरले, रस्ते नाले, नदीमध्ये पाणी साचले. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यातील जन जीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

श्रीवर्धनमधील शिघ्रे गावात घरांमध्ये पाणी शिरले. घरातील धान्य व इतर खाद्य पदार्थ भिजून गेले. भिंती ओल्या झाल्या . मिठेखार येथे वादळी पावसात घराचे पत्रे कौल उडाले. भिंती कोसळल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. किल्ले रायगड मार्गावर कोंझरच्यावर उजव्या हाताला असलेल्या धबधब्यातून मोठ्या प्रमाणात जलप्रवाह निर्माण झाल्याने तेथील मोरी वाहून गेली आहे . त्यामुळे रायगड मार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे . म्हसळा-गोरेगाव मार्गावरील खामगाव गावाजवळ एक मोठा वृक्ष कोसळल्याने वाहतूक बंद आहे.

उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे येथील आदिवासी वाडी वरील घरांचे अतोनात नुकसान झाले असून झोपड्यांवरील छप्पर उडून गेले आहेत. अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्या आदेशान्वये तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांनी सर्व आदिवासी कुटुंबांना सुखरूप स्थळी पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. उरणचे तहसिलदार डॉ उद्धव कदम यांनी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

महाजने - बेलोशी गावाचा संपर्क तुटला
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील नवीन पूलाचे काम मार्च महिन्यापासून सुरू आहे. वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून नदीतून रस्ता काढण्यात आला होता. मात्र, अवकाळी पाऊस पडल्याने नदीला पूर आला आहे. वाहतूकीच्या मार्गावर पाण्याचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह इतर सुविधा पोहचण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुट्टीमध्ये गावी आलेले मुंबईकर अडकले असून महाजने-बेलोशी गावाचा संपर्क तुटल्याची माहिती तुषार गुंड यांनी दिली.
शेतकरी अडचणीत
अवकाळी पावसाने शनिवार पासून जोव्दार सुरुवात केली. भात पेरणीसह बियाणे खरेदीच्या हंगामा वर त्याचा परिणाम झाला. शेत जमीनी पावसाच्या पाण्याने भरल्याने पेरणी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा राहिला आहे.