विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचा गंभीर प्रश्न; कंपन्या, पायलट आणि प्रक्रियेवर संशय
| मुंबई | प्रतिनिधी |
दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक मुद्दे मांडले. ही दुर्घटना साधा अपघात नसून, त्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त करत त्यांनी विमान कंपनी, पायलट, देखभाल प्रणाली आणि संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाची तज्ज्ञांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली.
रोहित पवार यांनी मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या 27 जानेवारीच्या प्रवास वेळापत्रकापासून ते विमानाच्या तांत्रिक बाबींपर्यंत अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवार हे मुंबईहून गाडीने पुण्याकडे जाणार होते. ताफ्याची तयारीही झाली होती. मात्र, एका महत्त्वाच्या नेत्याच्या उशिरा झालेल्या भेटीमुळे वेळापत्रक ढासळले आणि अखेर त्यांना विमानाने जावे लागले, असा दावा त्यांनी केला.
“व्यक्तीला लक्ष्य करायचे असेल तर त्याच्या चालकावर हल्ला करणे हा सोपा मार्ग असतो,” असा एका पुस्तकातील उल्लेख सांगत त्यांनी या दुर्घटनेमागे घातपात असू शकतो, अशी शंका व्यक्त केली. मात्र त्यांनी कोणावर थेट आरोप नसल्याचे स्पष्ट केले. रोहित पवार यांनी व्हिएसआर विमान कंपनी, ‘ॲरो’ कंपनी आणि कपूर नावाच्या पायलटबाबत संशय व्यक्त केला. ॲरो कंपनीने व्हिएसआरचे विमान भाड्याने घेतले होते. व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्ष परिस्थिती काय होती, याची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले. या कंपन्यांचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
“सरकारवर किंवा डीजीसीएवर आरोप नाही. पण, या प्रकरणाची चौकशी तज्ज्ञ संस्थेकडून व्हावी. ब्लॅक बॉक्समधील माहिती तज्ज्ञांसोबत कुटुंबातील प्रतिनिधीला पाहण्याची संधी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले नाही, चौकशी संथ गतीने सुरू आहे, काही गोष्टी दाबल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. व्हिएसआर कंपनीकडून पायलटवर दबाव आणला जातो, वेळेआधी फ्लाइट उडवायला भाग पाडले जाते, कॉस्ट कटिंगसाठी सुरक्षेकडे दुर्लक्ष होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांच्या मते, व्हिजिबिलिटी कमी असतानाही विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला. विमान अन्य विमानतळावर वळवले असते तर कंपनीचे आर्थिक नुकसान झाले असते. त्यामुळे घाई करण्यात आली असावी, असा त्यांचा दावा आहे. तसेच विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती, पीटीटी सिस्टिममध्ये आवाज नव्हता, देखभाल प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे, असेही त्यांनी नमूद केले. ब्लॅक बॉक्समधून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले. या सर्व पार्श्वभूमीवर, हा अपघात होता की घात होता? हा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल, तांत्रिक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली.
27 जानेवारीचा घटनाक्रम
रोहित पवार यांनी सांगितले की, 27 जानेवारीला कॅबिनेट बैठकीनंतर दादांनी काही अधिकारी, पक्षातील नेते आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याचे ठरवले होते. त्यानंतर ते गाडीने मुंबईला जाणार होते. ताफाही तयार होता आणि एका मोठ्या नेत्याची भेट ठरली होती. मात्र, त्या नेत्याला उशीर झाल्यामुळे चर्चा उशिरापर्यंत सुरू राहिली. त्यामुळे संध्याकाळी सुमारे 5.30 वाजता गाडीने जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. पर्याय नसल्याने विमान बुक करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संध्याकाळी 7.13 वाजता विमान बुक झाले.
पूर्व विदर्भातील नेत्याच्या फोननंतर फाईलवर सही
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व विदर्भातील एका नेत्याकडून फोन आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर एका महत्त्वाच्या फाईलवर सही करणे आवश्यक असल्याचे कळले. ती फाईल मंत्रालयात असल्याने ती आणण्यात वेळ गेला आणि त्यामुळे प्रवासाचा आराखडा बदलला.
राजकीय सल्लागाराचा करार रद्द करण्याबाबत चर्चा
रोहित पवार यांनी सांगितले की, मागील तीन-चार महिन्यांत दादा आणि काही अधिकाऱ्यांमध्ये एका राजकीय सल्लागाराचा शेकडो कोटी रुपयांचा करार रद्द करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्या कराराचा काही फायदा होत नसल्यामुळे तो रद्द करण्याचा विचार सुरू होता. बारामती येथील हॉस्टेलमध्ये झालेल्या एका बैठकीतही दादांनी काही लोकांना “राजकारण आम्हाला शिकवू नका, सर्वेक्षणाचे काम करा,” असे स्पष्ट सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.
विमान उड्डाणाबाबत दादांची भूमिका
रोहित पवार म्हणाले की, दादा नेहमी वैमानिकाच्या निर्णयाला प्राधान्य देत असत. उड्डाणापूर्वी ते नेहमी “उडायचे का नाही” याबाबत पायलटचा सल्ला घेत असत.दोन-अडीच वर्षांपूर्वी लोणावळ्यात धुके वाढल्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण धोकादायक असल्याचे पायलटने सांगितले होते. त्यावेळी दादांनी उड्डाण रद्द करून गाडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला होता.
ईमेलमधील वैमानिकांची नावे बदलल्याचा दावा
रोहित पवार यांनी एका ईमेलचा उल्लेख करत सांगितले की, त्यात कॅप्टन साहिल आणि कॅप्टन यश अशी दोन नावे वैमानिक म्हणून सुचवली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी वैमानिकाचे नाव बदलण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या सर्व घटनांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. “सत्य समोर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.







