योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठा
जामरुंग ग्रामपंचायतीचे कार्य आदर्शवत
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायतीने सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांच्या निर्मितीतून पाण्याचे स्त्रोत जतन करण्याचा निर्णय घेतला. त्याला ग्रामस्थांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच आज ही ग्रामपंचायत पाणीदार झाली आहे. पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, पण लोकांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होत आहे. ग्रामपंचायतीची जलसाक्षरता मोहीम लहान आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत अशीच आहे.
कर्जत तालुक्यातील टेंभरे ही लोकसंख्येच्या दृष्टीने आणि आकारमानाचे दृष्टीने मोठी असलेल्या ग्रामपंचायतीचे विभाजन 2018 मध्ये झाले होते. त्यातून जामरुंग ही नवीन ग्रामपंचायत तयार झाली आणि प्रसिद्ध सोलनपाडा धरण, ऐतिहासिक पेठ किल्ला असलेले पेठ गाव, तसेच कामतपाडा, ठोंबरेवाडी आणि अन्य गावांची मिळून बनलेल्या जामरुंग ग्रामपंचायतीला दत्तात्रय पिंपरकर यांच्या रुपाने अनुभवी सरपंच थेट जनतेतून मिळाले. त्यांच्या मदतीला उपसरपंच रोहिणी घुडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य अरुण मेदगे, संदेश सावंत, शिवाजी बिबवे, अश्विनी पिंपरकर, सुनिता मेदगे, वेदिका सावंत, छगन गावंडा, रेखा शेंडे फसाबाई ठोंबरे तसेच प्रकाश चव्हाण, भगवान बांगर, पोलीस पाटील ज्योत्स्ना मेदगे यांचे सहकार्य गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरत आहे.
ग्रामपंचायतीमधील पेठ आणि जामरुंग अशी महसूल गावे आणि डुक्करपाडा, कामतपाडा, सोलनपाडा, ठोंबरवाडी, लिंमणेवाडी, हिरेवाडी अशी गावे समाविष्ठ आहेत. या पहिल्या सदस्य मंडळाने ग्रामपंचायतीमध्ये सर्वांना मुबलक पाणी मिळावे यासाठी नियोजन केले आणि ज्या गावांना नळपाणी पुरवठा योजना अस्तिवात नव्हत्या, अशा सर्व गावांना पाणीपुरवठा योजना राबविण्याचे धोरण हाती घेतले. या ग्रामपंचायत हद्दीमधील सोलनपाडा म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या जामरुंग येथील पाझर तलावाच्या पाण्याचे उद्भव स्तोत्र वापरून कायमस्वरूपी नळपाणी योजनांना पाणी मिळेल याची व्यवस्था करून घेतली. गावागावात नळाला पाणी आल्याने ग्रामस्थांच्या चेहर्यावरील आनंद दिसू लागले, पण त्यावेळी मार्च महिना आला की पाझर तलावातील पाणी सोडण्यावर बंधने येत होती. त्यातून नळपाणी योजना कुचकामी ठरणार नाहीत यासाठी पाझर तलावातील पाण्याचे वाटप नियोजन नक्की केले. रायगड जिल्हा परिषदेने देखील सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांच्या पाझर तलावातील पाणीवाटप नियोजनाला हो म्हणत पाण्याचे नियोजन ठरवून घेतले. या नळपाणी योजनांमधून घरोघरी पोहचणारे पाणी शुद्ध असावे यासाठी जलकुंभ यांच्या खाली पाणी शुद्धीकरण संचदेखील बसवून घेतले आहेत.
बंधार्यांची निर्मिती
ग्रामपंचायत जलसाक्षर करण्यासाठी पाझर तलावातील पाणी ज्यामार्गाने चिल्हार नदीकडे मार्गक्रमण करते, त्या मार्गावरील जुने सिमेंट बंधारे यांच्यातून होणारी पाणीगळती थांबविण्याचे काम हाती घेतले. लोकांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून घ्यायचे आहे. हा हेतू मनात ठेवून सिमेंट बंधारे दुरुस्त केले. डुक्करपाडा, ठोंबरेबाडी भागातील डोंगरामधून वाहत जाणारे पाणी अडविण्याचे धोरण ग्रामपंचायतीने नक्की केले आणि चार ठिकाणी नवीन सिमेंट बंधारे आणि पाणी साठवण बंधारे यांची जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून बंधार्यांची निर्मिती केली.
रोजगाराला पाणी…
या भागातील जनतेचा मोठा रोजगाराचा भाग म्हणजे या भागातून उन्हाळ्यातदेखील चिल्हार नदीत बांधलेल्या सिमेंट कोल्हापुरी टाइप बंधारे यांच्यामुळे पाणी अडवले आहे. त्या पाण्यावर येथील लोक रोपवाटिका यांची शेती करतात. हजारो रोपे तयार करण्याचे काम या भागातील शेतकरी करीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व भाग पाण्याच्या दृष्टीने सुखी बनले आहेत.