। चिपळूण । प्रतिनिधी ।
शहरालगतच्या कळंबस्ते-आंबडस रस्त्यालगत असलेल्या गटारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. यामुळे पावसाळ्यात या रस्त्यालगतच्या गटाराची समस्या निर्माण होणार असून संबंधित यंत्रणेने याची तत्काळ दखल घ्यावी; अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला आहे.
पंधरागाव विभागातील काही गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणी योजनेचे काम सुरू आहे. या योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून हे काम सुरू असून संबंधित ठेकेदाराने मात्र ही पाईपलाईन थेट गटारातून टाकली आहे. याबाबत मुकादम यांनी आक्षेप घेत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अधिकारी नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच या कामाची पाहणी करू आणि संबंधित ठेकेदाराला सूचना देऊ असे सांगितलेे. यावर मुकादम यांनी आक्षेप घेतला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. पावसाळ्यापूर्वी पीडब्ल्यूडीकडून गटारांची साफसफाई करण्यात येते. गटार नसलेल्या ठिकाणी गटार काढण्यात येते. मात्र, त्याच गटारात पाईपलाईन टाकली जात असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसा? संबंधित ठेकेदार तेच गटार दोन ते तीन फूट आणखी खणून ही पाईपलाईन टाकत आहे. त्यामुळे भविष्यात या पाईपलाईनला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. गटाराच्या बाहेरून ही पाईपलाईन टाकण्यात यावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.